बेकायदेशीर वाळू उपसा व परप्रांतीय कामगाराच्या कृत्याबाबत महिला आक्रमक
आचरा, दि.१५ मार्च (अर्जुन बापर्डेकर)
तोडवळी-तळाशिल येथील वाळू उपसा बंद करणे व इतर मागण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्यासमवेत झालेल्या बैठकीला 15 दिवस उलटून गेल्यानंतरही कोणतीही कारवाही न झाल्याने तोंडवळी तळाशील येथील ग्रामस्थांनी स्थगित केलेले खडीतील आंदोलन पुन्हा पुर्वसुचना न देता पुन्हा चालू करणार असल्याचे निवेदन देत जिल्हाधिकारी यांना इशारा दिला होता.या पार्श्वभूमीवर गुरुवारी सायंकाळी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी तोंडवळी तळाशील येथे येत ग्रामस्थांची भेट घेत कालावल खाडी व समुद्रकिनारी भागाची पहाणी केली यावेळी ग्रामस्थ, महिलांनी बेकायदेशीर वाळू उपसा व परप्रांतीय कामगार यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत कारवाईची मागणी केली.
यावेळी जिल्हाधिकारी यांच्यासमवेत जिल्हापोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, मालवण तहसीलदार वर्षा झालटे, पतन अभियंता विना पुजारी, महाराष्ट्र मेरिटईम बोर्ड सहाय्यक बंदर निरीक्षक अरविंद परदेशी, मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे,आचरा मंडल अधिकारी अजय परब, तोंडवळी तळाशिल, खोतजुवा,शेलटि मधील महिला ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी भेटीदरम्यान तळाशील येथील महिलांनी बेकायदेशीर होत असलेला वाळू उपसा थांबवण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली उपस्थित महिलांनी अनधिकृतपणे राजरोस होत असलेला वाळूउपसा केव्हा थांबणार असा सवाल करत आपण यावर कारवाई करा अन्यथा ग्रामस्थ कायदा हातात घेऊन वाळू उपसा रोखतील असा इशारा यावेळी दिला. यावर जिल्हाधिकारी तावडे यांनी उद्यापासून यावर कारवाई सुरु करणार कारवाई होत नसल्यास मला संपर्क करा असे ग्रामस्थांना सांगितले
परप्रांतीय कामगारांविरोधात महिला आक्रमक
यावेळी तळाशील येथील महिलांनी परप्रांतीय कामगारां विरोधात आक्रमक भूमिका घेत याभागात वाळू उपसा करण्यासाठी हजारो परप्रांतीय कामगार राहत असल्याची बाब सांगत. काही दिवसापूर्वी एका परप्रांतीयाकडून गोमातेला बांधून तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार घडला असून ते प्रकरण दबवले गेले आहे. असे प्रकार होत असतील तर आज आमच्या लहान मुली महिला सुरक्षित राहतील का? हाच प्रसंग आमच्यावर ओढवला तर त्याला जबाबदार कोण असा सवाल महिलांनी जिल्हाधिकारी यांना केला यावेळी जिल्हाधिकारी यांनी सादर प्रकरणबाबत पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांना लक्ष घालण्यास सांगून परप्रांतीय भैय्यांवर कारवाई करण्याची सूचना केली.
पाहणीदरम्यान जिल्हाधिकारी यांनी समुद्रकिनारी बंधारा नसलेल्या भागात एक किमीचा बंधारा मंजूर झाला असून लवकरच त्याचे काम चालू होणार असल्याचे सांगितले तसेच खाडी किनाऱ्यालगत बंधारा व गाळ उपसा करण्यासाठी डेझरिंगसाठी लवकरच एस्टीमेट तयार करून संबंधित मागण्या मार्गी लावणार असल्याचे आश्वस्थ केले.
आचरा मासळी मार्केट मध्ये तळाशील येथील मच्छिविक्रेत्या महिलांना बसू दिले जात नसून तेथील स्थानिक विक्रेत्या महिला अडवत असून विक्रीसाठी नेलेली मासळी नष्ट करण्याच्या धमक्या देत आहेत स्थानिक प्रशासनही आम्हला कोणतेही सहकार्य करत नसून उद्या कोणताही प्रश्न निर्माण झाल्यास त्याला जबाबदार कोण असा सवाल केला यावेळी जिल्हाधिकारी यांनी तहसीलदार यांना मासळी विक्रेत्या व संबंधित प्रशासन यांची तातडीने मालवण तहसीलदार कार्यालयात बैठक घेऊन निर्णय घेण्याची सूचना जिल्हाधिकारी तावडे यांनी केली.