सावंतवाडी दि.२० मार्च
दोडामार्ग तालुक्यामध्ये सरसकट वृक्षतोड बंदी असताना सासोली गावात धन दांडग्याकडून खाजगी जंगलासह वन जमिनीमध्ये सुनियोजित जंगलतोड सुरू असून प्लॉटिंग करण्यात आले आहे. संबंधितांची जिल्हाधिकारी आणि वन विभागाकडून पाठराखण केली जात असून स्थानिक तहसीलदार व जिल्हाधिकारी याला जबाबदार आहेत .याबाबत उच्च न्यायालयात स्वतंत्र याचिका दाखल करणार असल्याची माहिती वनशक्ती व आवाज फाउंडेशनचे स्टॅलिन दयानंद यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सावंतवाडी येथे सासोली येथील ग्रामस्थांसह स्टॅलिन दयानंद यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांच्या समवेत सामाजिक कार्यकर्ते संदीप सावंत, नंदकुमार पवार ,मनोज गवस विजय ठाकूर, चंद्रशेखर गवस, संतोष परब, बापू सावंत उपस्थित होते.
ते म्हणाले, सासोली भागात मोठ्या प्रमाणात जंगलतोड सुरू आहे. एकदम वृक्षतोड समोर येऊ नये याकरिता संबंधित जंगलात रस्ते बनवले जात आहेत त्या ठिकाणी त्या प्रमाणात बिहारी कामगार असून त्यांच्याकडून रात्रीच्या वेळी जंगलतोड केली जाते ज्या ठिकाणी जंगलतोड केले आहे त्या ठिकाणी जेसीपीच्या साह्याने प्लॉटिंग करण्यात आले. ४० ते ५० कामगार वन्य प्राणी वस्तीत मुक्काम केला आहे.या बाहेरील राज्यातील धन दांडग्यांकडून हा प्रकार केला जात असून वनविभागाला हाताशी धरून हे प्लॅनिंग केले जात आहे मुळात दोडामार्ग तालुक्यामध्ये न्यायालयाची सरसकट वृक्षतोड बंदी असताना त्या ठिकाणी वृक्षतोड होतेच कशी? हा मुळात प्रश्न आहे. त्यामुळे स्थानिक तहसीलदार आणि जिल्हाधिकारी या सगळ्याला कारणीभूत आहेत. सासोली हा गाव निसर्ग संपन्न गाव म्हणून ओळखला जातो परंतु या ठिकाणी होणारी वृक्षतोड लक्षात घेता या गावाची ओळखच संपणार आहे ज्याप्रमाणे खंडाळा मध्ये झालेली वृक्षतोड आणि त्या ठिकाणी उभे राहिलेले सिमेंटचे जंगल इमारती लक्षात घेता भविष्यात सासोली गावातही हाच प्रकार पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या संदर्भात उच्च न्यायालयात वेगळी याचिका दाखल करणार आहे.
यावेळी ग्रामस्थांनी बाजू मांडली ते म्हणाले मुळात ज्या भागात प्लॉटिंग चे काम सुरू आहे ती जमीन सामाहिक क्षेत्रात येते त्यामुळे या जमिनीची विक्री होणे कठीण आहे असे असतानाही सर्व यंत्रणेला हाताशी धरून हा प्रकार केला जात आहे दुसरीकडे खाजगी जमिनीला लागून असलेल्या ६०० मीटर वन जमिनीमध्ये ही वृक्षतोड करून संबंधितांनी अतिक्रमण केले आहे त्याकडेही वन विभागाने कानाडोळा केला आहे आज मोठ्या प्रमाणात बाहेरील परप्रांतीयांना आणून या ठिकाणी काम सुरू आहे त्यामुळे गावातील स्थानिक महिला परिसरामध्ये काजू गोळा करण्यासाठी तसेच अन्य कामासाठी जाण्यास घाबरत आहेत वेळोवेळी आम्ही यासंदर्भात स्थानिक प्रशासन पोलीस प्रशासन जिल्हाधिकारी सर्वांकडे लेखी तक्रारी केल्या परंतु आम्हाला कोणाकडूनच जात मिळाले नाही.