सावंतवाडी दि.२१ मार्च
नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गाची मागणी नसताना सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीतील गावातून जाणार असल्याने तो विनाशकारी प्रकल्प ठरेल असे वनशक्ती व आवाज फाऊंडेशन चे स्टॅलिन दयानंद यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
सावंतवाडी येथील पत्रकार परिषदेत स्टॅलिन दयानंद बोलत होते. त्यांच्या सोबत संदीप सावंत, नंदकुमार पवार आदी उपस्थित होते.
नागपूर ते गोवा अशा शक्तिपीठ महामार्गाचे कोकणात गरज नसताना शासनाकडून महामार्ग केला जात आहे. सर्व पर्यायी मार्ग असताना या नव्या मार्गाची गरज नसताना धनदांडग्यांना गुंतवणूकीचे माध्यम उपलब्ध करून देण्यासाठी हा खटाटोप आहे असे त्यांनी सांगितले.
सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील गावातून हा मार्ग जात असल्याने या दोन्ही तालुक्यांसाठी हा महामार्ग विनाशकारी ठरणार आहे त्यामुळे गरज नसलेल्या या महामार्गाच्या विरोधात आपण न्यायालयात आव्हान देणार आहे. या महामार्गामुळे पन्नास टक्के वन्यजीव विस्थापित होणार असून धन दांडग्यांच्या घशात खाजगी जमने काढण्यासाठी या विनाशकारी प्रकल्प चे प्लॅनिंग केले गेले आहे त्यामुळे कोकणाला गुलामगिरी मध्ये आणायचं का हा विचार करून येथील जनतेने याला विरोध केला पाहिजे असेही स्टॅलीन दयानंद यांनी सांगितले.