सावंतवाडी,दि.२२ मार्च
पाणी हे मानव जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचे असुन पाण्याशिवाय जगणे हे जवळपास अशक्य गोष्ट आहे, भूपृष्ठावर उपलब्ध असलेल्या पाण्याचे परिमाण हे वापरणाऱ्याच्या तुलनेत अत्यंत अल्प असल्यामुळे या पाण्याचे संगोपन, संरक्षण, संवर्धन आणि अपव्यय हे आजच्या काळाची गरज बनली आहे असे प्रतिपादन तिलारी पाटबंधारे उपविभागाचे उपविभागीय अभियंता संतोष कविटकर यांनी केले.
जागतिक जलदिनाचे औचित्य साधून तिलारी पाटबंधारे खात्यामार्फत ओटवणे, विलवडे, इन्सुली, मडूरे हायस्कूलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या जल जागृती सप्ताह कार्यक्रमात संतोष कविटकर बोलत होते. यावेळी तिलारी पाटबंधारे खात्याचे उप अभियंता श्री अनिल मोहिते, अभियंता श्री पाटील, श्री डांबरेकर, श्री पेडणेकर, श्री पटेल, विलवडे सरपंच प्रकाश दळवी, राजा शिवाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक बुद्धभूषण हेवाळकर, ओटवणे सरपंच आत्माराम गावकर, उपसरपंच संतोष कासकर, माजी सरपंच रवींद्र म्हापसेकर देवस्थान कमिटी अध्यक्ष रवींद्र गावकर, हायस्कूलचे मुख्याध्यापक राजेंद्र देसाई, ओटवणे शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार मनोहर मयेकर, मुंबई मंडळाचे समन्वयक दशरथ गावकर, पांडुरंग कर्पे, महादेव मयेकर, श्री भुते, इन्सुली हायस्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीम. केरकर, मडूरा माजी सरपंच सुरेश गावडे श्री वालावलकर, श्री केणी, हायस्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीम. परब आदी उपस्थित होते.
२२ मार्च हा जागतिक जलदिन म्हणून संयुक्त राष्ट्रामार्फत घोषित करण्यात आला आहे. याचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनामार्फत १६ मार्च ते २२ मार्च पर्यंत जल जागृती सप्ताह म्हणून दरवर्षी साजरा केला जातो. यावेळी विलवडेतील राजा शिवाजी विद्यालय आणि ओटवणे येथील श्री देव रवळनाथ विद्यामंदिर, इन्सुलिन येथील नूतन माध्यमिक विद्यालय, मधुरा येथील न्यू इंग्लिश स्कूल या चारही विद्यालयात तिलारी पाटबंधारे खात्याच्या उपस्थित अधिकारी वर्गाने पाण्याचे संगोपन, संरक्षण, संवर्धन आणि अपव्यय याबाबत प्रोजेक्टर वरून जलजागृतीचे सादरीकरण करून विद्यार्थ्यांसह उपस्थिततांचे जल प्रबोधन केले. त्यानंतर सर्वांनी जल प्रतिज्ञा म्हणून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या जल जागृती सप्ताहासाठी पाटबंधारे खात्याचे अधीक्षक अभियंता वी. बा. थोरात, कार्यकारी अभियंता वी बा. जाधव यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.
.. दरम्यान या जल जागृती सप्ताहाचा शुभारंभ शनिवारी १६ मार्च रोजी ओरोस येथे जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्याहस्ते सिंधुदुर्ग जिल्यातील सर्व नद्यांच्या पाण्याचे कलश पूजन करून करण्यात आला. होता. त्यानंतर जिल्ह्यात पाटबंधारे खात्याच्यावतीने जल जागृतीपर अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. दोडामार्ग तालुक्यातील कुडासे, घोडगेवाडी, कोनाळकट्टा आदी गावातील माध्यमिक शाळामधेही जलप्रबोधन करण्यात आले.