श्रद्धांजली सभेत सहकाऱ्यांचे कंठ आले दाटून
सावंतवाडी,दि.२३ मार्च
सावंतवाडी सबनीसवाडा येथील श्री एकमुखी दत्त मंदिर उभारणीत स्व.राजन वामनराव आंगणे यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते, श्रीदत्त मंदिर हे जिल्ह्यातील देखणे भव्य मंदिर व्हावे, तिथे योगसाधना हॉल, आयुर्वेद उपचार, भक्त निवास अशी अनेक स्वप्ने त्यांनी उराशी बाळगली होती आणि ती पूर्ण होण्यासाठी मुंबई मंत्रालय पातळीवर भेटीगाठी घेत भक्त निवास मंजुरी, निधी उपलब्धता आदीसाठी प्रयत्न केला होता. भक्तनिवास होऊन त्या माध्यमातून जनसेवा घडावी यासाठी त्यांनी वेळोवेळी मुंबई वाऱ्या करून सहकाऱ्यांच्या मदतीने मंजुरी देखील मिळविली होती.
श्री एकमुखी दत्त मंदिर उभारणीची उंच उंच स्वप्ने पाहत असतानाच अचानक दि.१८ मार्च रोजी कुणालाही पुसटशी कल्पना नसतानाच हृदय विकाराच्या झटक्याने राजनभाईंची प्राणज्योत विझली आणि सहकाऱ्यांना जबर मानसिक धक्काच बसला. या मानसिक धक्क्यातून सावरत शुक्रवार दि. २२ मार्च सायंकाळी ५ वा. एकमुखी दत्त मंदिर सभागृहात उपसमिती सदस्यांकडून श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी उपसमिती तसेच बांधकाम समितीचे सदस्य, भक्तगण उपस्थित होते. यात प्रामुख्याने श्री.दयानंद गवस, श्री.रघुवीर मंत्री, श्री.सुधीर धुमे, श्री.दीपक पटेकर, श्री.विनायक पराडकर, श्री.सुधीर पराडकर आदिंनी आपल्या भावना व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली. श्री.दयानंद गवस यांनी राजन आंगणे यांच्या सोबतचा मंदिर उभारणी कामातील संपूर्ण प्रवास सांगून राजन भाईंचे कामातील महत्त्व विशद केले. जितेंद्र पंडित यांनी भक्त निवासची मंजुरी घेण्यासाठीचे प्रयत्न सुरू असताना राजन आंगणे यांचा मिळालेला भक्कम पाठिंबा, मुंबई येथील मंत्रालय पातळीवर भाईंची असलेली दांडगी ओळख यामुळे भक्त निवास मंजुरीचा झालेला सुकर प्रवास आदींवर भाष्य करत राजन भाईंचे मंदिर पूर्णत्वास गेलेले पहायला हवे होते असे सांगितले.
यावेळी सुधीर धुमे यांनी सुरुवातीला दत्त मंदिराचे पत्र्याचे छप्पर प्रस्तावित असताना राजन भाईंनी पत्र्याचे छप्पर न घालता संपूर्ण सभामंडपवर आरसीसी स्लॅब घालुया असे स्वप्न दाखविल्याचे व सर्वांनी मिळून पूर्णत्वास नेल्याचे आवर्जून सांगितले.. परंतु शेवटी श्रद्धांजली वाहताना त्यांना अश्रू अनावर झाले. सुधीर पराडकर यांनी रिक्षा युनियनच्या स्थापनेपासून, रुग्णवाहिका आणणे इत्यादी सर्व सामाजिक कामांमध्ये राजन भाईंनी कशी आर्थिक मदत करत सहकार्य केलं या आठवणी सांगताना त्यांचा कंठ दाटला होता. ज्येष्ठ सदस्य रघुवीर तथा भाई मंत्री, विनायक पराडकर , दीपक पटेकर यांनीही आठवणी जाग्या केल्या.
यावेळी समिती सदस्य श्री.जगदीश मांजरेकर श्री.अशोक नाईक, श्री.विलास सावंत, श्री.विलेश गोवेकर, श्री.सुभाष नाईक, श्री.शिरोडकर, सौ.मेघा तुळसुलकर , मिरा सिंग, श्रीम.सावंत, डॉ.कांचन विर्नोडकर, श्रीम.भगत, श्री.बाळ बोर्डेकर, श्री.सुहास सातोस्कर, सुभाष नाईक आदी सदस्य, भक्तगण, राजन आंगणे प्रेमी उपस्थित होते. सभेचे प्रास्ताविक दयानंद गवस यांनी केले तर आभार दीपक पटेकर यांनी मानले.