आजगाव साहित्य कट्ट्याच्या कार्यक्रमात नाट्यसंहितेवर चर्चा

सावंतवाडी दि.२४ मार्च 
“नाटक हे प्रामुख्याने नटाचे माध्यम असले, तरी सकस संहितेविना ते यशस्वी होऊ शकत नाही. जयवंत दळवी, प्र.ल.मयेकर, वसंत कानेटकर, मधुसुदन कालेलकर ,विजय तेंडुलकर अश्या अनेक दिग्गजांनी चांगल्या संहिता देऊन रंगभूमीची सेवा केली आणि नाट्य संहितेचा प्रवास पौराणिक कथानकाकडून सामाजिक प्रश्नांपर्यंत गेला.” असे प्रतिपादन विनय सौदागर यांनी आजगाव येथे केले. निमित्त होते साहित्य प्रेरणा कट्ट्याच्या मासिक एकेचाळीसाव्या कार्यक्रमाचे. कट्ट्याचे समन्वयक सौदागर यांनी प्रथम प्रास्ताविकात कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केल्यानंतर विविध नाट्य संहितांचा आढावा घेतला. गंगाराम गवाणकरांचे वस्त्रहरण, जयवंत दळवींचे संध्याछाया, विजय तेंडुलकरांचे सखाराम बाईंडर यांपासून प्राजक्त देशमुख यांच्या देवबाभळी पर्यंतच्या नाट्यसंहितेंचा उल्लेख करताना शेक्सपियर च्या शोकांतिकांवर बेतलेल्या कानेटकरांच्या गगनभेदी या नाटकाची संहिता अधिक भावल्याचे त्यांनी सांगितले.
त्यानंतर झालेल्या चर्चेत सरोज रेडकर यांनी तात्यासाहेब शिरवाडकर यांच्या नटसम्राट या नाटकाचा आढावा घेतला. तसेच या नाटकातील ‘कुणी घर देता का घर’ हे स्वगत सादर केले. कट्ट्यावर प्रथमच आलेल्या गुरुनाथ परब यांनी आपण पाहिलेल्या अनेक नाटकांचा उल्लेख करताना जयवंत दळवी यांच्या नातीगोती या नाटकाचा आढावा घेतला. सोमा गावडे यांनी तेंडुलकरांच्या कमला नाटकाचा उल्लेख करीत नाट्यसंहिता केवळ मनोरंजनासाठी नसते, तर त्यातून काही संदेशही दिला जातो,असे सांगितले. हाच धागा पकडून सिंधु दिक्षित यांनी शारदा नाटकातील जरठकुमारी विवाह याविषया संदर्भात भाष्य केले. कोणतीही लिखित संहिता नसताना नाट्यसेवा करणाऱ्या दशावतार मंडळींचे कार्य कौतुकास्पद असल्याचे बबन आडारकर यांनी सांगितले.
या चर्चेत विनायक उमर्ये व यशवंत गिरी यानीही भाग घेतला, तसेच प्रकाश वराडकर, संदिप धाकोरकर, अनिता सौदागर,एकनाथ शेटकर आणि दिलीप पांढरे आदी साहित्यप्रेमी उपस्थिती होते.