जयानंद मठकर स्मृती पुरस्कार सतीश लळीत यांना ७ एप्रिलला होणार वितरण

 सावंतवाडी, दि.२५ मार्च
श्रीराम वाचन मंदिर व क्रीडा भुवन, सावंतवाडी यांच्यावतीने दिला जाणारा स्वातंत्र्यसैनिक, माजी आमदार जयानंद मठकर स्मृती पुरस्कार निवृत्त माहिती व जनसंपर्क अधिकारी सतीश लळीत यांना जाहीर झाला आहे. ७ एप्रिलला जयानंद मठकर यांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्त हा पुरस्कार लळीत यांना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या कमलाताई परुळेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. यापूर्वी हा पुरस्कार साहित्यिक मधु मंगेश कर्णिक, स्वातंत्र्यसैनिक नागेश करमली (गोवा), सामाजिक कार्यकर्त्या कमलताई परुळेकर, माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांना देण्यात आला आहे.
सतीश लळीत हे महाराष्ट्र शासनाया माहिती व जसंपर्क संचालनालयाचे निवृत्त उपसंचालक, मुख्यमंत्र्योंचे माजी मुख्य जनसंपर्क अधिकारी तसेच लोकराज्यचे माजी संपादक आहेत. आडाळी-दोडामार्ग येथील ‘घुंगुरकाठी’ संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. लळीत हे ३५ वर्षे माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. सुरुवातीला त्यांनी वृत्तपत्रांमध्ये तर २८ वर्षे महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क संचालनालयात काम केले. १९९१ मध्ये ते स्पर्धा परीक्षेद्वारे माहिती व जनसंपर्क संचालनालयात प्रथम वर्ग राजपत्रित अधिकारी म्हणून रुजू झाले. शासकीय सेवेतही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. राज्य शासनाच्या मुखपत्र असलेल्या ‘लोकराज्य’ या मासिकचे त्यांनी तीन वर्षे संपादन केले. मंत्रालयातील वृत्तपत्र या दृकश्राव्य विभागाचे ते पहिले प्रमुख होते. त्यांनी अनेक माहिती पटांची निर्मिती केली. सह्याद्री दूरदर्शन वाहिनीवर ‘विकासगाथा’ मालिका त्यांनी एक वर्ष चालविली. सन २००७ मध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्यावरील ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या पुस्तकाचे लेखन केले. ‘सिंधुदुर्गातील कातळशिल्पे’ हा या विषयावरील पहिला व एकमेव संशोधनपर ग्रंथ प्रकाशित आहे. गेली २३ वर्षे ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कातळशिल्पांचा अभ्यास व संशोधन करत आहेत. मालवणी बोली व साहित्य संशोधन केंद्र, सिंधुदुर्गचे ते उपाध्यक्ष व कार्यवाह आहेत. महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचा सन २००७ चा ‘उत्कृष्ट कार्यकर्ता अधिकारी’ पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. तसेच महाराष्ट्र शासनाचा २००८ चा शासकीय गटाचा ‘यशवंतराव चव्हाण उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार’ त्यांना तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला होता.