दोडामार्ग,दि.१ एप्रिल
मराठी सर्वांगसुंदर भाषा आहे भारतातील बावीस अधिकृत भाषांपैकी मराठी भाषा ही एक भाषा आहे.मराठी भाषा भारतामध्ये सर्वात जास्त बोलणाऱ्या भाषांपैकी तिसरी भाषा आहे.तिचा तोडवा अमृतापेक्षा अधिक आहे.मराठी भाषेला फार मोठी परंपरा लाभलेली आहे .ही मराठी माणसाची लाडकी मायबोली भाषा असून महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा आहे.त्यामुळेच सर्वानी विशेषत : तरुण पिढी आणि मुलांनी मराठी भाषेच्या जतन व विकासासाठी अधिक जागरुक राहणे आवश्यक आहे.असे प्रतिपादन मळगाव इंग्लिश स्कूलचे माजी मुख्याध्यापक शशिकांत साळगावंकर यांनी केले.
मळगाव येथील कै.प्रा.उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.मराठी भाषेचे थोर साहित्यिक कुसुमाग्रज तथा वि.वा.शिरवाडकर यांच्या विषयी माहिती सांगून यावेळी मराठी भाषेचे महत्व आणि उपयोगिता या बरोबरच मराठी भाषा समृद्धीसाठी आपण सर्वानी आज कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत याचे त्यांनी यावेळी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते कुसुमाग्रजांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आले.यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी शशिकांत साळगावंकर संस्था अध्यक्ष महेश खानोलकर,उपाध्यक्ष पंत वालावलकर,उपस्थित होते.मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने मळगाव इंग्लिश स्कूल मळगावच्या विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी स्वरचित कविता सादर केल्या.तसेच मळगाव हायस्कूलचा नववीचा विद्यार्थी कु.बापू जोशी याने वि.वा.शिरवाडकर यांच्या नटसम्राट या गाजलेल्या नाटकातील आपासाहेब बेलवलकर उत्तम रीतीने सादर करुन उपस्थितांची वाहवा मिळविली.वाचन मंदिराचे अध्यक्ष महेश खानोलकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले.कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सूत्रसंचालन कार्यवाह गुरुनाथ नार्वेकर यांनी केले.तर उपाध्यक्ष पंत वालावलकर यांनी आभार प्रदर्शन केले.कार्यक्रमाला वाचनालयाचे कार्यकारी मंडळ सदस्य हेमंत खानोलकर,बाबली नार्वेकर,बी.एस.मुळीक वाचक व सभासद चंद्रशेखर अय्यर,चंद्रकांत जाधव,सतिश राऊळ यांच्यासह मळगाव हायस्कूलचे विद्यार्थी उपस्थित होते.