गोट्या सावंत : राणेंचे निष्ठावंत अन् पक्षासाठी अहोरात्र मेहनत करणारे नेतृत्व

निवडणूक जिंकण्याची गोट्या सावंत आगळीच हटके “स्टाईल” ; कार्यकर्त्यांना ताकद देणारे कणखर नेतृत्व…

कणकवली दि.३ एप्रिल(भगवान लोके)

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या मुशीत घडलेले एक कणखर नेतृत्व म्हणजे संदेश उर्फ गोट्या सावंत…! अनेकदा प्रतिकूल, कठिणातील कठीण वाटणारी निवडणूकदेखील एकतर्फी जिंकावी कशी जिंकावी..ही आगळीच हटके “स्टाईल” गोट्या सावंत यांची राहिली आहे.केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि राणे कुटुंबीयांचे निष्ठावंत अन् भारतीय जनता पक्षासाठी अहोरात्र मेहनत करणारे नेतृत्व म्हणजे गोट्या सावंत आहेत. राजकारणातील कुशल नेतृत्वाचा अर्थात गोट्या सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त घेतलेला आढावा…!

सिंधुदुर्गाच्या राजकारणात केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचे खंदे, विश्वासू अन् लढवय्या शिलेदार गोट्या सावंत यांचा ५० वा वाढदिवस साजरा होत आहे. सिंधुदुर्ग जिल्हापरिषद मध्ये २००२ मध्ये नाटळ जिल्हा परिषद मतदारसंघाच्या माध्यमातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून खर्‍या अर्थाने लोकप्रतिनिधी पदाची कारकिर्द सुरू केली. त्यानंतर ‘नारायण राणे हाच आपला पक्ष’ मानून आतापर्यंत कार्यरत राहणारे राणे यांच्या पाठीशी नेहमीच उभे रहाणारे गोट्या सावंत हे कट्टर निष्ठावंत म्हणून ओळखले जातात.

विद्यार्थी दशेपासून विकासाला केंद्रबिंदू मानून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली राजकारणात उतरलेल्या गोट्या सावंत यांनी आपल्या कार्यशैलीने अनेक गोरगरिबांना न्याय मिळवून दिला. तर, यापूर्वी राणे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना, काँग्रेस पक्षात असताना भूषविलेली पक्षीय पदे तसेच नारायण राणे यांनी विश्वासाने सोपविलेल्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या माध्यमातून त्यांनी गावागावात विकासाची गंगा आणली. जि.प.अध्यक्ष म्हणून केलेलं काम लक्षवेधी आहे.

गोट्या सावंत यांचा सर्वसामान्य कुटुंबातील जन्म झाला होता. मात्र, त्यांनी राजकीय वाटचालीत बघता बघता केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा गळ्यातील ताईत कधी बनला हे कुणालाच कळले नाही. एकीकडे नाटळ जि.प. मतदारसंघामधून सातत्याने विजयश्री खेचून आणणारा हा अवलिया २०१२ च्या जि.प. निवडणूकीत कणकवली शहराला लागून असलेल्या कलमठ जि.प. मतदारसंघामध्ये उतरला. ‘गोट्या सावंत ’ यांच्या सर्वात मोठ्या मताधिक्याने झालेला विजय कोणीही विसरु शकत नाही. जिल्हाभरात होणार्‍या विविध निवडणुकांमध्ये रणनितीकार म्हणून राणे कुटुंबियांकडे असलेल्या काही नावांपैकी महत्वपूर्ण नाव म्हणजेच गोट्या सावंत यांचे आहे. जिल्हा बँक निवडणुकीत त्यांनी राबविलेली रणनीती फार महत्वाची ठरली.

गोट्या सावंत यांच्या माध्यमातून होणारे विविध सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक शैक्षणिक उपक्रमही तितकेच लक्षवेधी असतात. कारण राजकारणात कितीही मोठी उंची गाठली तरी पाय जमिनीवर असणारा हा नेता आहे. साहजिकच ‘साहेब’ या पदवीपेक्षा सावंत हे विशेषतः कनेडी, नाटळ परिसरात ‘गोट्या ’ याच नावाने परिचित राहिले आहेत. खासकरून आबालवृद्धांसाठी ते ‘देवमाणूस’ बनले आहेत. सिंधुदुर्गजिल्ह्यामध्ये शैक्षणिक क्रांती निर्माण व्हावी, यासाठी युवा संदेश प्रतिष्ठान , नाटळ-सांगवे यामाध्यमातून अनेक स्तुत्य उपक्रम दरवर्षीच राबविलेजातात. रक्तदान शिबिर, शिष्यवृत्ती सराव परीक्षा, निबंध स्पर्धा, चित्रकला, हॉलीबॉल, जेष्ठांना देवदर्शन असे अनेक उपक्रम राबविले जातात. जिजाऊ फाउंडेशनच्या माध्यमातून जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना लाखो वही वाटप हा उपक्रम सर्वसामान्यांसाठी फार महत्वाचा आहे.

सामाजिक, सांस्कृतिक राजकीय चळवळीत काम करत असताना संदेश उर्फ गोट्या सावंत यांना त्यांची पत्नी तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यादेखील नेहमी समर्थपणे साथ देत असतात. कुठला चांगला प्रसंग असो किंवा वाईट प्रसंगात खंबीरपणे रस्त्यावर उतरत पाठराखण करण्याची भूमिका संजना सावंत बजावत आहेत. गोट्या सावंत यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्ग 24 तास परिवाराकडून मनःपूर्वक शुभेच्छा.