सिंधुदुर्ग फळबागायतदार संघाला बैठकीसाठी वेळ देऊनही दिवसभर ताटकळत ठेवल्याने शेतकऱ्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत मंत्री केसरकर यांचा जाहिर निषेध केला

बांदा,दि. ३ एप्रिल
काजू हमीभावासंदर्भात शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सिंधुदुर्ग फळबागायतदार संघाला बैठकीसाठी वेळ देऊनही शेतकऱ्यांना दिवसभर ताटकळत ठेवल्याने शेतकऱ्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत मंत्री केसरकर यांचा जाहिर निषेध केला. शेतकऱ्यांच्या तोंडाला नेहमीच पाने पुसण्याचा प्रकार होत असल्याने शेतकरी आता पेटून उठला आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देण्याचा ईशारा फळबागायतदार संघांचे अध्यक्ष विलास सावंत यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला.
यावेळी फळबागायतदार संघांचे प्रकाश वालावलकर, विष्णू सावंत, नारायण गावडे, गोपाळ करमळकर, संजय देसाई, अरुण पंडित, राकेश धर्णे, आकाश नरसुले, प्रवीण परब, यशवंत माधव यांच्यासह पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
विलास सावंत यांनी मंत्री केसरकर व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. गोव्याच्या धर्तीवर येथील काजू बागायतदारांना हमीभाव मिळणे गरजेचे होते. मात्र शासन उदासीन धोरण राबवत आहे. मंत्री केसरकर यांनी वेळ देऊनही उपस्थित न राहता शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ केला आहे. येत्या निवडणुकीत शेतकरी त्यांना जागा दाखवून देणार आहेत.