लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा नामोनिशाण राहणार नाही…

मालवण येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मंत्री ना नारायण राणे यांनी केली घणाघाती टिका 

मालवण,दि.५ एप्रिल
पाच खासदार आणि सोळा आमदार असणाऱ्या पक्षाचे उद्धव ठाकरे हे पंतप्रधान मोदींना तडीपार करण्याची भाषा दिल्लीत जाऊन करतात मात्र ४ जून नंतर कळेल कोण कोणाला तडीपार करतो लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा नामोनिशाण राहणार नाही, उद्धव ठाकरेची शिवसेना राजकारणाला जय महाराष्ट्र करेल अशी घणाघाती टिका भाजपचे नेते आणि केन्द्रीय मंत्री ना नारायण राणे यांनी मालवण येथे आजच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केली

मालवण तालुका भाजपचा कार्यकर्ता मेळावा आज सायंकाळी मालवण येथील दैवज्ञ भवन येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी मालवण तालुका भाजप तसेच मालवण व्यापारी बांधवांच्या वतीने नारायण राणे यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर माजी खासदार निलेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, दत्ता सामंत, अशोक सावंत, मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, रणजित देसाई, सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, सुहास हडकर, बाबा मोंडकर, विजय केनवडेकर, महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, संध्या तेरसे, रश्मी लुडबे, पूजा करलकर, सरोज परब आदी व इतर पदाधिकारी उपस्थित होते. प्रारंभी धोंडी चिंदरकर यांनी प्रास्ताविक केले.

यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले, आजपर्यंत मी कोणतेही पद मागितले नाही. जी पदे मिळाली ती माझ्या मेरिटवर मिळत गेली महाराष्ट्रात सर्वात जास्त मंत्रिपदे मी भूषवली आहेत. २०१४ मधील माझा पराभव हा अपघात होता. त्यावेळी मी निवडून येणार असे समजून बिनधास्त राहिलो. मात्र यावेळी मी योग्य ती दखल घेईन, भाजपच्या चारशे खासदारांमध्ये तुमचा हक्काचा खासदार जावा यासाठी कामाला लागा, असे आवाहन यावेळी राणे यांनी केले.

ते पुढे म्हणाले आताचे आमदार, खासदार यांनी गेल्या दहा वर्षात जिल्ह्याच्या विकासासाठी काय केले ? आमदाराने धूप अगरबत्ती वाटण्याचे काम केले, मात्र विकास काय केला ? म्हणूनच ७ मे रोजी होणारी निवडणूक या जिल्ह्याचे आणि येथील लोकांचे भवितव्य ठरविणारी आहे. त्यामुळे लोकांनी आमदार खासदारांच्या भुलथापाना बळी पडू नये. असेही राणे यावेळी म्हणाले.यावेळी राणे यांनी भारताला विकसित राष्ट्र आणि महासत्ता बनविण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न असून यंदाची लोकसभा निवडणूक देशाच्या दृष्टीने महत्वाची आहे. अबकी बार चारसौ पार असा नारा पंतप्रधान मोदी यानी दिला. या चारशेमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघातून तुमचा हक्काचा खासदार असावा, त्या चारशे खासदारांमध्ये नारायण राणे असावा, यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन त्यांनी केले

 

यावेळी निलेश राणे म्हणाले, यंदाची लोकसभा निवडणूक फक्त जिंकायची नाही, तर गाजवायची आहे. आताच्या खासदार, आमदार यांनी दहा वर्षात येथील जनतेला तडफडत ठेवले आहे. फक्त बोलत राहिले, कामे काहींच केली नाहीत. त्यामुळे आता जनतेने भुलथापाना बळी पडू नये. भाजप कार्यकर्त्यांनी गावागावात जाऊन लोकांशी संवाद साधावा. नारायण राणे हे खासदार म्हणून निवडून आले तर जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलून जाईल, असा विश्वास निलेश राणे यांनी व्यक्त केला.यावेळी दत्ता सामंत, प्रभाकर सावंत, अशोक सावंत, सुदेश आचरेकर, श्वेता कोरगावकर, सरोज परब यांनीही विचार मांडत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन विजय केनवडेकर यांनी केले. यावेळी मालवण तालुक्यातील बहुसंख्या भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.