कणकवली दि. ०६ एप्रिल(भगवान लोके)
तालुक्यातील नाटळ राणेवाडी येथील प्रितेश उद्देश राणे (वय २०) याने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी ९ वाजता उघडकीस आली. आईशी झालेल्या किरकोळ भांडणानंतर त्याने आत्महत्या केल्याचा अंदाज आहे. त्याने नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती.
या आत्महत्येबाबत प्रितेश याची आई नैनिता हिने आज कणकवली पोलीस ठाण्यात खबर दिली. यात म्हटले आहे की, ती आपल्या दोन मुली आणि पती समवेत मुंबईला राहते. तर मुलगा शिक्षणासाठी नाटळ येथे असतो. बारावीची परीक्षा असल्याने २२ मार्च रोजी ती नाटळ येथे आपल्या घरी आली होती. ४ एप्रिल रोजी प्रितेश याचे त्याची आई नैनिता हिच्याशी भांडण झाले. त्यामुळे नैनिता हिने त्याच दिवशी दुपारी १२.३० वाजता कपडे व इतर चीजवस्तू घेऊन दिगवळे गावात राहणाऱ्या नणंदेकडे राहण्यासाठी गेली होती. तर ६ एप्रिलला सकाळी मुंबईला जाण्यासाठी ती नाटळ राणेवाडी येथे आपल्या घरी सकाळी ९ वाजता आली. त्यावेळी घराच्या पुढचा दरवाजा बंद होता. त्यामुळे मागील बाजूने जाऊन पाहिल्यानंतर मागील दरवाजा उघडा दिसला..तिने आत जाऊन पाहिले असता घरातील छताच्या वाशाला दोरी बांधून प्रितेश याने गळफास लावून घेतल्याचे दिसून आले. नैनिता राणे यांनी याबाबत स्थानिकांना माहिती दिली. त्यानंतर कणकवली पोलिसांना कळविण्यात आले. या घटनेचा अधिक तपास हवालदार मिलिंद देसाई करत आहेत.