भाजप नेते दत्ता सामंत यांची घोषणा.
मालवण,दि.०६ एप्रिल
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात महायुतीचा उमेदवार कोण याविषयी साऱ्यांनाच उत्सुकता असतानाच भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी गेले दोन तीन दिवस सिंधुदुर्गात ठिकठिकाणी कार्यकर्ता मेळावे घेत निवडणुकीत ट्विस्ट आणला असतानाच भाजपचे प्रांतिक सदस्य आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे विश्वासू सहकारी दत्ता सामंत यांनी मालवणच्या कार्यकर्ता मेळाव्यात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर माणगाव येथील टेंबे स्वामीं समोर नतमस्तक होऊन श्रीफळ वाढवीत ना राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ केला जाईल अशी घोषणा केली आहे. ही घोषणा करतानाच त्यांनी २०१४ पूर्वी सिंधुदुर्गात जी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक झाली होती त्यावेळी राणे यांच्या स्वाभिमान पक्षाचा प्रचाराचा शुभारंभाचा नारळ आपण टेंबे स्वामींच्या मंदिरात वाढविण्यात आला होता आणि त्याला यशही मिळाले होते असे वाणगीदाखल उदाहरणही श्री सामंत हे द्यायला विसरले नाही.
मालवण तालुका भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा काल दैवज्ञ भवन मालवण येथे झाला यावेळी भाजप नेते श्री दत्ता सामंत यांनी धडाकेबाज भाषण केले. आपल्या भाषणात श्री दत्ता सामंत यांनी हातचे राखून न ठेवता २०१४ च्या पराभवाची कारण मिमांसा करीत भाजप कार्यकर्त्यांना सजग केले.
यावेळी बोलताना दत्ता सामंत म्हणाले नारायण राणे यांच्या नेतृत्वात १९९० सालपासून काम करताना आम्हाला हरण्याची सवय नव्हती. मात्र २०१४ साली नारायण राणे यांच्या झालेल्या पराभवाचे शल्य आजही आम्हाला आहे. मात्र २०१४ च्या पराभवाचे शल्य २०२४ मध्ये भरून काढणार असून आता लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघातून नारायण राणे यांना जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून आणण्याचा शब्द आम्ही देतो. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर माणगाव येथील टेंबेस्वामींच्या मंदिरात टेंबेस्वामींसमोर नतमस्तक होऊन श्रीफळ वाढवून नारायण राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ आम्ही करणार आहोत,
यावेळी दत्ता सामंत पुढे म्हणाले, २०१४ सालचा नारायण राणे यांच्या पराभवाचे शल्य आजही आम्हाला आहे. तो पराभव आमच्या निष्काळजीपणामुळे किंवा अतिविश्वासामुळे झाला असेल. मात्र आता लोकसभा निवडणुकीत नारायण राणे यांना गावागावातून जास्तीत जास्त मताधिक्य देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. प्रत्येक गावातील भाजप कार्यकर्त्याने आपापल्या बूथवर ८० टक्के मतदान घेण्याचा प्रयत्न करावा. नारायण राणे हे केंद्रीय मंत्री असल्याने निवडणूक प्रचारादरम्यान त्यांच्यावर देशातील प्राचाराचीही जबाबदारी आहे. मात्र तरीही राणे यांनी जास्तीत जास्त वेळ सिंधुदुर्गात देण्याचा प्रयत्न करावा, त्यांची उपस्थिती आणि त्यांनी कार्यकर्त्यांच्या पाठीवर ठेवलेला हात यामुळे कार्यकर्त्यांमध्ये अधिक काम करण्याची क्षमता निर्माण होते, असेही दत्ता सामंत म्हणाले.