भाजपचा मालवण तालुका कार्यकर्ता मेळावा
मालवण,दि.०६ एप्रिल
आताच्या खासदार, आमदार यांनी दहा वर्षात येथील जनतेला तडफडत ठेवले आहे. फक्त बोलत राहिले, कामे काहींच केली नाहीत. त्यामुळे आता जनतेने भुलथापाना बळी पडू नये. भाजप कार्यकर्त्यांनी गावागावात जाऊन लोकांशी संवाद साधावा. नारायण राणे हे खासदार म्हणून निवडून आले तर जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलून जाईल, यंदाची लोकसभा निवडणूक केवळ जिंकायची नाही, तर गाजवायची आहे, असे प्रतिपादन निलेश राणे यांनी मालवण येथे बोलताना केले.
भाजपचा मालवण तालुका कार्यकर्ता मेळावा मालवण येथील दैवज्ञ भवन येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. त्यावेळी निलेश राणे हे बोलत होते.
यावेळी निलेश राणे म्हणाले, रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक भाजप युतीच्या माध्यमातून जिंकायची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश महासत्तेच्या दिशेने वाटचाल करीत असताना रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा मागील १० वर्षांचा बॅकलॉग भरून काढण्याची क्षमता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यात आहे. येथील आमदार, खासदार यांनी दहा वर्षांत काहीही केले नाही. त्यामुळे लोकही त्यांना कंटाळले आहेत, अशी टीका नीलेश राणे यांनी केली.
विरोधकांकडे विकासाबाबत बोलण्यासारखे काहीही नाही. केवळ अफवा पसरवणे, टीका करणे हेच त्यांचे काम आहे. मात्र विरोधकांनी आमच्या बाबत कितीही अफवा केल्या तरी आम्ही सर्वजण एकसंध आहोत, हे विरोधकांनी आता लक्षात ठेवावे. विरोधकांच्या भूलथापाना आता जनताही कंटाळली आहे. निवडणुकीत याचे उत्तर मतदानातून दिसेल. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून भाजप युतीचाच विजय होणार, असा विश्वासही नीलेश राणे यांनी व्यक्त केला.
विरोधकांकडे कोणताही मुद्दा नसल्याने आमच्या संघटनेमध्ये वादाचे प्रसंग उभे करून नसलेल्या गोष्टींची चर्चा बाहेर करण्याचा प्रयत्न केला जात असतो. आजपर्यंत जेवढे वाईट बोलता येईल तेवढे बोलून विरोधकांकडील मुद्दे संपलेले आहेत. त्यामुळे आता कार्यकर्त्यांनाही विरोधकांच्या खोट्या प्रचाराची सर्व गणिते समजून आली आहेत. त्यामुळे आपण आणि दत्ता सामंत आम्ही एकत्रितच असून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराला विजयी करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करणार आहोत, असे नीलेश राणे यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत म्हणाले, रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात भाजपचा खासदार असावा यासाठी भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते गेली काही वर्षे मेहनत घेत आहेत. नारायण राणे यांच्यावर जनतेचे प्रेम असून त्यांच्या उपस्थितीमुळे जिल्ह्यातील वातावरण बदलले असून कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या गावात, बूथवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, नारायण राणे व भाजप यांच्या कार्याची माहिती पोहोचवली पाहिजे. काळानुसार निवडणूक लढविण्याच्या पद्धतीत बदल होत असून त्यानुसार आपण नियोजन केले पाहिजे. मत देण्यामागचा मतदारांचा विचारही बदलत चालला आहे. त्यामुळे गृहिणी, तरुण वर्ग, विविध समाज यांच्याशी संवाद साधत त्यांचा कल घेतला पाहिजे. विरोधकांच्या अपप्रचाराला चांगल्या पद्धतीने उत्तर दिले पाहिजे, असेही सावंत म्हणाले.
यावेळी अशोक सावंत म्हणाले, गेल्या दहा वर्षात विकासाच्या बाबतीत सिंधुदुर्ग जिल्हा मागे पडला आहे विद्यमान खासदारांनी स्वतःच्या तळगावातही कोणते विकासकाम केले नाही ते मतदार संघाचा विकास काय करणार ? तर आमदारांनी कधी आमसभा घेतली नाही. १९९० सालापासून आम्ही नारायण राणे यांच्या सोबत आहोत. तेव्हापासून त्यांनी जी जबाबदारी दिली आहे ती आजपर्यंत आम्ही पार पाडत आहोत. आजही आम्ही राणे यांच्यासोबत असून आताही आम्ही सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन भाजपचा उमेदवार निवडून देऊ, असेही सावंत म्हणाले.
यावेळी सुदेश आचरेकर म्हणाले, मालवणसह जिल्ह्याची जी परिस्थिती सुधारली ती नारायण राणे यांनी केलेल्या कामांमुळेच सुधारली आहे. मालवण मधील पर्यटन वाढीलाही नारायण राणे यांचे कार्य कारणीभूत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कायापालट करणारा सीवर्ल्ड प्रकल्पही नारायण राणे यांनी आणला होता मात्र, नतभ्रष्ट लोकांनी या प्रकल्पाला विरोध केल्याने हा प्रकल्प रद्द होण्याच्या मार्गावर आहे. गेल्या दहा वर्षात जिल्हा भकास करण्याचेच धोरण आताच्या खासदार, आमदार यांनी राबविले. एकही प्रकल्प जिल्ह्यात आला नाही विकासाच्या बाबतीत आपला जिल्हा २५ वर्षे मागे गेला आहे. त्यामुळे आता खासदारकीसाठी नारायण राणे हेच उमेदवार हवेत, तरच जिल्ह्याचा कायापालट होईल असेही, आचरेकर म्हणाले.
यावेळी धोंडी चिंदरकर म्हणाले, २०१४ च्या निवडणुकीत आमच्याकडून काही चुका झाल्या असतील. मात्र, आता कोण चूक कोण बरोबर हे बघण्याची वेळ नाही. आपल्यातील मतभेद बाजूला ठेवून नारायण राणे यांना शब्द देऊया, लोकसभा निवडणुकीत आम्ही सर्व कार्यकर्ते राणे यांच्या सोबत आहोत. या लोकसभा निवडणुकीत खासदार म्हणून नारायण राणे यांना दिल्लीत पाठवायचे आहे. तर विनायक राऊत यांना पुन्हा मुंबईत पाठवायचे आहे, असेही चिंदरकर म्हणाले. यावेळी सरोज परब व भाजप महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर यांनीही विचार मांडत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.