नैसर्गिक जंगल कत्तल झाल्यावर उभ्या राहणाऱ्या कृत्रिम जंगलात नैसर्गिकता नसते-जेष्ठ पत्रकार सतिश लळीत

सावंतवाडी,दि.७ एप्रिल
नैसर्गिक पर्यावरणावर कुऱ्हाड कोसळली तर पर्यावरणीय बदलामुळे होणाऱ्या परिणामांना सामोरे जावे लागते. नैसर्गिक जंगल कत्तल झाल्यावर उभ्या राहणाऱ्या कृत्रिम जंगलात नैसर्गिकता नसते, असे प्रतिपादन जेष्ठ पत्रकार सतिश लळीत यांनी केले. ते म्हणाले, पर्यावरणाबद्दल कोणतीही आस्था नसणारे सरकार दहा वर्षे केंद्रात आहे. ते कायदे व संस्था वाकवून निर्णय घेत आहेत.

श्रीराम वाचन मंदिर व क्रीडा भुवन सावंतवाडी आयोजित स्वातंत्र्यसैनिक जयानंद मठकर व्याख्यानमाला वर्ष २०२४ वर्ष “कोकणातील बदलते पर्यावरण आणि कातळशिल्पांचे जतन” या विषयावर सेवा निवृत्त माहिती जनसंपर्क अधिकारी, पत्रकार सतिश लळीत यांनी मांडणी केली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रान माणूस प्रसाद गावडे होते.
यावेळी माजी आमदार, स्वातंत्र्यसैनिक जयानंद मठकर स्मृती पुरस्काराने सतिश लळीत यांना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यी श्रीमती कमलताई परूळेकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी वाचन मंदिर अध्यक्ष प्रसाद पावसकर, डॉ सई लळीत,कार्यवाह रमेश बोंद्रे, कार्याध्यक्ष अँड संदीप निंबाळकर, लेखक प्रवीण बांदेकर,सौ सिमा मठकर, मिहीर मठकर डॉ सुमेधा नाईक धुरी आदी उपस्थित होते.
यावेळी लेखक प्रा.प्रवीण बांदेकर ३३ वर्ष शैक्षणिक सेवा करून सेवानिवृत्त झाले म्हणून सत्कार करण्यात आला.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यी श्रीमती कमलताई परूळेकर म्हणाल्या, जयानंद मठकर यांच्या बऱ्याच गुणांचा साधर्म्य असणारे सतिश लळीत यांना स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ती योग्य निवड समितीने केली आहे. नुकताच ५३ दिवसांचा अंगणवाडी कर्मचारी संघटनेचा संप झाला. मठकर यांना लोकशाही अभिप्रेत होती. ८५ कोटी लोकांना फुकट धान्य वाटप. उज्ज्वला गॅस सिलिंडर वाटप. त्यामुळे लोकशाही वाचवण्यासाठी संकल्प करून मठकर यांना अभिप्रेत काम करा.

कोकणातील बदलते पर्यावरण आणि कातळशिल्पांचे जतन या विषयाची मांडणी व सत्काराला उत्तर देताना जेष्ठ पत्रकार सतिश लळीत म्हणाले, प्रा मधू दंडवते,जयानंद मठकर यांच्या सान्निध्यात काही दिवस घालवता आले त्यामुळे पुरस्कार स्वीकारताना माझी जबाबदारी वाढली आहे. समाजवादी विचारसरणीचा प्रभाव वाढविण्यासाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे असे समजतो.
लळीत म्हणाले, बदलते पर्यावरण नव्हे. पर्यावरण बदलत नाही. नष्ट कर्मी माणासाने पर्यावरण बदलण्यास भाग पाडत आहे. नैसर्गिक पर्यावरण आणि सांस्कृतिक पर्यावरण असे दोन भाग होतात. सांस्कृतिक पर्यावरण बदलत असते. मात्र नैसर्गिक पर्यावरण बदल होत नाही. नैसर्गिक पर्यावरण निर्माण करण्यासाठी भरपूर काळ जावा लागतो. पण नैसर्गिक पर्यावरणावर कुऱ्हाड मारली जाते तेव्हा मोठा पर्यावरणीय ऱ्हास होत आहे. जंगल तोडण्यासाठी दोडामार्ग मध्ये न्यायालयाची बंदी असूनही कुऱ्हाड मारली जात आहे.
लळीत म्हणाले, पर्यावरणाचा ऱ्हास सुरू आहे तो विनाशकारी ठरत आहे. नैसर्गिक जंगल कत्तल झाल्यावर उभ्या राहणाऱ्या कृत्रिम जंगलात नैसर्गिकता नाही. पर्यावरणाबद्दल कोणतीही आस्था नसणारे सरकार दहा वर्षे केंद्रात आहे. अस्तित्वात असलेले कायदे व संस्था मन मानेल तशा वाकवल्या जात आहेत. पर्यावरणाला हानिकारक प्रकल्प मंजूर करताना जनतेला कळणार नाही अशी खबरदारी घेतली जात आहे. जलयुक्त शिवार योजना मजुरांची होती पण ती कंत्राटदारांची ठरली आहे. त्यामुळे जैवविविधतेला धोका निर्माण होत आहे.
यावेळी रान माणूस प्रसाद गावडे यांनी अध्यक्षीय भाषणात जैवविविधता, नैसर्गिक साधनसंपत्ती असलेल्या परिसराची मांडणी केली.