कोणाचीही मागणी नसताना सह्याद्री पट्ट्यातील व्याघ्र काॅरिडाॅर मधून मार्ग नेण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला-ज्येष्ठ पत्रकार सतिश लळीत

सावंतवाडी,दि.८ एप्रिल
नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गासाठी कोणाचीही मागणी नसताना सह्याद्री पट्ट्यातील व्याघ्र काॅरिडाॅर मधून मार्ग नेण्यासाठी आराखडा तयार करण्यात आलेला आहे याबाबत जनता अनभिज्ञ आहे त्यामुळे जनजागृती होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार सतिश लळीत यांनी केले.

श्रीराम वाचन मंदिर व क्रीडा भुवन सावंतवाडी आयोजित स्वातंत्र्यसैनिक जयानंद मठकर व्याख्यानमाला वर्ष २०२४ वर्ष “कोकणातील बदलते पर्यावरण आणि कातळशिल्पांचे जतन” या विषयावर सेवा निवृत्त माहिती जनसंपर्क अधिकारी, पत्रकार सतिश लळीत यांनी मांडणी केली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रान माणूस प्रसाद गावडे होते.
यावेळी माजी आमदार, स्वातंत्र्यसैनिक जयानंद मठकर स्मृती पुरस्काराने सतिश लळीत यांना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यी श्रीमती कमलताई परूळेकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी वाचन मंदिर अध्यक्ष प्रसाद पावसकर, डॉ सई लळीत,कार्यवाह रमेश बोंद्रे, कार्याध्यक्ष अँड संदीप निंबाळकर, लेखक प्रवीण बांदेकर,सौ सिमा मठकर, मिहीर मठकर डॉ सुमेधा नाईक धुरी आदी उपस्थित होते.

सतिश लळीत म्हणाले, तुळजापूर ते गोवा पर्यंत पर्यायी मार्ग कार्यरत असताना शक्तीपीठ महामार्गाची गरज काय? यासाठी कोणाची मागणी आहे असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. शक्तीपीठ मार्ग पर्यावरणीय संवेदनशील असलेल्या आंबोली,गेळे,पारपोली,फुकेरी,डेगवे असा परिसरातून जाणार आहे. हा परिसर टायगर क्वाॅरीडाॅर आहे. या व्याघ्र काॅरिडाॅर साठी न्यायालयात स्टॅलिन यांनी वनशक्ती व आवाज फाऊंडेशन च्या माध्यमातून याचिका दाखल केली आहे.

शक्तीपीठ या रस्त्याबाबत जनतेला माहिती नाही. पर्यावरणीय जनसुनावणी झाली नाही. पर्यावरणीय आघात अहवाल नाही. सह्याद्री पट्ट्यातून रस्ता जाणार आहे. हा तथाकथित शक्तीपीठ मार्ग गुपचूप होत आहे. संकेश्वर ते बांदा मार्ग नियोजित आहे.तो कुठपर्यंत आला आहे. कुठून जाणार आहे ते जनतेला सांगितले जात नाही.शक्तीपीठ महामार्गाची आवश्यकता नसताना अशा तथाकथित शक्तीपीठ महामार्गाला कसा विरोध करता येईल हे पहावे लागेल, असे सतीश लळीत यांनी सांगितले.

यावेळी रान माणूस प्रसाद गावडे यांनी कोकणपण हरवलं जात आहे त्याचे संरक्षण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे असे सांगितले.