मालवण ,दि.८ एप्रिल
मालवण येथे नारायण राणे यांची झालेली बैठक हि त्यांच्या समारोपाची बैठक होती. त्या बैठकीस फक्त राणे समर्थक उपस्थित होते, निष्ठावान भाजप कार्यकर्ते उपस्थित नव्हते. केवळ शिवसेना व ठाकरेंवर टीका करणाऱ्या राणे पिता पुत्रांनी ठाकरेंची काळजी करू नये. तसेच निलेश राणे यांनी लोकसभा निवडणूक गाजविणार असे म्हटले असले तरी शिवसैनिकही खासदार विनायक राऊत यांना पुन्हा एकदा संसदेत पाठविण्यास सज्ज असून आम्ही फक्त रत्नागिरी सिंधुदुर्गचे मैदान गाजवणार नाही तर तुमचा बँडबाजा वाजवणार, असा रोखठोक इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिला.
मालवण येथील ठाकरे शिवसेना शाखेत आज आयोजित पत्रकार परिषदेत हरी खोबरेकर हे बोलत होते. यावेळी माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, शहरप्रमुख बाबी जोगी, नितीन वाळके, महेश जावकर, महिला तालुका संघटक दीपा शिंदे, तालुका समन्वयक पूनम चव्हाण, सोनाली डिचोलकर, लक्ष्मी पेडणेकर, यशवंत गावकर, नरेश हुले, चिंतामणी मयेकर आदी व इतर उपस्थित होते.
यावेळी हरी खोबरेकर म्हणाले, मालवणी ते नारायण राणे यांची झालेली बैठक म्हणजे त्यांच्या समारोपाची बैठक होती. या बैठकीत राणे यांनी शिवसेनेवर टीका केली. २००५ मध्येही नारायण राणे यांनी अशीच टीका करत शिवसेना औषधालाही शिल्लक ठेवणार नाही, असे म्हटले होते. परंतु तेच औषध त्यांनाच लागू पडले. त्यांनी स्थापन केलेला पक्ष नऊ महिन्याच्या आतच त्यांना विसर्जित करावा लागला, हे राणे नाकारू शकतात का ? त्यामुळे राणे यांनी ठाकरे यांची चिंता करू नये. शिवसेना सांभाळण्यासाठी, वाढविण्यासाठी आणि शिवसेनेला विजयापर्यंत नेण्यासाठी निष्ठावंत शिवसैनिक सज्ज आहेत. यात समारोपाच्या बैठकीत राणे यांना मागील पाच वर्षात आपण काय काम केले, कोकणाला काय दिले, निलेश राणे यांनी त्यांच्या खासदारकीच्या काळात काय काम केले हे सांगितले पाहिजे होते. मात्र त्यांना सांगता आले नाही. केंद्रीय मंत्री राणे यांनी जिल्ह्यासाठी पाच वर्षात काय काम केले हे राणे यांच्या सह त्यांच्या कार्यकर्त्यांनाही माहित नाही. त्यामुळे ते लेखाजोगा मांडू शकले नाही, हे त्यांचे कार्यकर्तेही नाकारू शकत नाहीत. कामाचा लेखाजोगा कसा मांडावा हे त्यांच्या समर्थकांनाही माहित नाही. विनायक राऊत गेली दहा वर्षे रत्नागिरी – सिंधुदुर्ग मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत. ते सर्वसामान्य माणसाचे नेतृत्व करत असून संसदेत त्यांचे प्रश्न मांडून न्याय मिळवून देण्याचे काम राऊत यांनी केले आहे. खास. राऊत हे आपल्या कामाचा लेखाजोगा योग्य पद्धतीने मांडत आहेत. त्यामुळे खासदाराने कामाचा लेखाजोगा कसा मांडावा यासाठी राणे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी राऊत यांचा लेखाजोगा वाचावा, असा टोला यावेळी हरी खोबरेकर यांनी लगावला.
१९९० साली नारायण राणे जेव्हा जिल्ह्यात आले तेव्हा भाई गोवेकर यांच्या सारख्या शिवसैनिकांनीच पुढाकार घेऊन नारायण राणे यांना गावागावात फिरवले. निवडणुकीसाठी मातोश्रीच्या आदेशाने प्रचार केला. ज्या मातोश्रीने नारायण राणे यांना मोठे केले, विविध पदे दिली त्या मातोश्रीवरच राणे टीका करत असून त्याची चीड कोकणवासियांना आहे, असेही हरी खोबरेकर म्हणाले. कोकणात प्रदूषणकारी प्रकल्प लादण्याचे व त्यांना समर्थन देण्याचे काम नारायण राणे व भाजप मंडळी करत आहेत. सिडको सारखे संकट आज कोकणवर येत आहे. विकासाच्या नावाखाली कोकण भकास करण्याचे काम भाजप करत आहेत. म्हणून येत्या निवडणुकीत आम्ही हे विविध मुद्दे घेऊन लोकांसमोर जाणार आहोत.
निलेश राणे यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार जिंकण्याचे, निवडणूक गाजविण्याचे वक्तव्य केले. मात्र निलेश राणे यांचे हे दिवास्वप्नच राहील. कारण सर्व शिवसैनिक सज्ज झाले असून रत्नागिरी सिंधुदुर्गचे मैदान आम्ही गाजवणार नाही तर तुमचा बँडबाजा वाजविणार, आणि भगवा गुलाल उधळून विनायक राऊत यांच्या विजयाची हॅट्ट्रिक करून त्यांना पुन्हा संसदेत पाठविणार, असा इशारा हरी खोबरेकर यांनी दिला.