वेंगुर्ला,दि.१० एप्रिल
तोक्ते वादळामधील नुकसान भरपाई पासून वंचित राहिलेल्या शेतक-यांची नुकसान भरपाईची यादी तसेच अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भात पिक घेणा-या बाधीत शेतक-यांचीही नुकसान भरपाई यादी शासनाकडून प्रसिद्ध झालेली आहे. या यादीनुसार शासनाकडे रक्कम जमा असताना सद्या निर्माण झालेल्या सर्वर डाऊनमुळे शेतक-यांची ई के.वाय.सी. होत नाही. त्यासाठी तालुक्यातील शेतक-यांना शारीरीक, मानसिक त्रास तसेच आर्थिक भुर्दंड पडत आहे. वृध्द शेतक-यांना याचा जास्त त्रास होत आहे. याबाबत वेंगुर्ला तहसिलदार व तालुका कृषि अधिकारी यांनी त्वरीत योग्य तो निर्णय घेऊन शेतक-यांना शासनाकडून आलेली नुकसान भरपाई त्वरीत मिळण्यासाठी उपाय योजना राबवावी अशी मागणी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी संघटना जिल्हा अध्यक्ष तथा वेंगुर्ला तालुका राष्ट्रवादी कृषी सेल अध्यक्ष शामसुंदर राय यांनी वेंगुर्ला तहसिलदार व तालुका कृषि अधिकारी यांचेकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.