काजू बागायतदार आणि काजू कारखानदार यांच्यात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी समन्वय घडवून आणत प्रतिकिलो ५ रूपये वाढ

सावंतवाडी दि.१० एप्रिल 
काजू बागायतदार आणि काजू कारखानदार यांच्यात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी समन्वय घडवून आणत ११५ आणि १२० रुपये प्रतिकिलो दराने काजू बी खरेदीचा निर्णय घेण्यात आला. यासोबतच शासनाने मंजूर केलेले दहा रूपयांचे अनुदान निवडणूकीच्या आचारसंहितेनंतर मिळेल असे या बैठकीतील चर्चेत ठरले. आजच्या बैठकीत खरेदी पेक्षा प्रति किलो कारखानदार ५ रूपये वाढवून देणार आहेत असे त्यांनी सांगितले.
शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यालयात काजू बागायतदार शेतकरी आणि काजू कारखानदार यांच्यात शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी समन्वय घडवून काजू बी खरेदीचा मार्ग सुकर होईल असा प्रयत्न केला. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी,सावंतवाडी दोडामार्ग बागायतदार संघाचे अध्यक्ष विलास सावंत, अभिलाष देसाई, जगदेव गवस, संजय देसाई , प्रदीप सावंत,आकाश नर्सुले, राकेश धर्णे, विठ्ठल मुरूडकर, जनार्दन नाईक तसेच काजू कारखानदार अध्यक्ष सुरेश बोवलेकर, सचिव बिपीन वरसकर, सुधीर झाट्ये,बाबू पोकळे, सिध्देश शिरोडकर आदी उपस्थित होते.
शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर म्हणाले, सरकारने आचारसंहितेपूर्वी शेतकऱ्यांना १० रूपये काजू अनुदान आणि १३५ रूपये प्रति किलो भाव देण्याचा निर्णय घेतला होता पण आचारसंहितेमुळे अंमलबजावणी शक्य नाही त्यामुळे काजू कारखानदार व शेतकरी बागायतदार यांच्यात समन्वय घडवून आणला आहे. सध्या काजू ११५ रूपये खरेदी केला जातो तो आता १२० रूपये प्रतिकीलो भाव दिला जाईल तर १०० रूपये प्रतिकीलो भाव मिळत आहे तो ११५ रूपये प्रतिकीलो भाव मिळेल. म्हणजे कारखानदार खरेदी दरापेक्षा प्रतिकिलो पाच रुपये वाढवून मिळतील तर सरकार दहा रुपये अनुदान देईल मात्र निवडणूक आचारसंहितेनंतर १० रूपये प्रतिकीलो अनुदान बाबतीत निर्णय घेतला जाईल असे त्यांनी सांगितले.
केसरकर म्हणाले, केंद्र सरकारने अडीज टक्के आयात शुल्क ठेवले आहे ते १८ टक्के करावे अशी मागणी करण्यात येणार आहे.
बागायतदार संघाचे अध्यक्ष विलास सावंत म्हणाले, काजू बी दर यंदाचा आहे. पुढच्या वर्षी बाबतीत तेव्हा निर्णय घेतला जाईल.