एसटी कामगार संघटनेच्या लढ्याला यश; दिलीप साटम यांची माहिती
कणकवली दि.११ एप्रिल(भगवान लोके)
वाहकांच्या अपहारप्रकरणी एकाच गुन्ह्यात दोन वेगवेगळ्या शिक्षा देण्याचा निर्णय बदलून एसटी महामंडळाने अखेर २०१७ चे ते संबधित परिपत्रकच रद्द केले आहे. त्यामुळे मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटनेच्या लढ्याला यश मिळाले आहे. अशी माहिती संघटनेचे राज्य उपाध्यक्ष दिलीप साटम यांनी दिली आहे.
याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी वाहकांच्या अपहरप्रकरणी बदली करण्याबाबतचे परिपत्रक २०१७ मध्ये जारी केले होते.त्यामुळे एसटीच्या वाहक वर्गात असंतोष होता. ते परिपत्रक निघाल्यापासून मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटनेने त्याला विरोध केला होता. विनामूल्य विना तिकीटच्या तीन केसेस झाल्यावर त्या वाहकाची बदली प्रथम विभागाच्या बाहेर करण्यात येत होती. परंतु संघटनेने विरोध केल्यानंतर विभागांतर्गत बदली करण्यात येऊ लागली. मात्र, संघटनेने ते परिपत्रक रद्द करावे अशी भूमिका घेतली होती. त्यासाठी आंदोलनही केले. तसेच न्यायालयातही धाव घेतली होती.न्यायालयानेही एका गुन्ह्यात दोन शिक्षा देता येत नाहीत, असे स्पष्ट केले होते . अखेर एसटी कामगार संघटनेच्या प्रयत्नांना यश आले असून महामंडळाकडून हे परिपत्रक रद्द करण्यात आले असल्याची माहिती
४ एप्रिल रोजी एसटीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक माधव कुसेकर यांनी दिली.
माधव कुसेकर यांच्या समवेत झालेल्या बैठकीत मान्यताप्राप्त संघटनेने ते परिपत्रक रद्द करण्याबाबत व्यापक व आक्रमक पद्धतीने बाजू मांडली. त्यानुसार ते परिपत्रक रद्द करण्यात यश आले आहे.
याशिवाय लिपिक,टंकलेखकांचा प्रश्न ,२४० दिवसांची अट, वाहक ते लिपिक टंकलेखक पदी बढती, चालक,वाहक, कार्यशाळा कर्मचारी यांच्या विश्रांतीगृहाची सुविधा, महिला कर्मचारी विश्रांतीगृह ,गणवेशाचे कापड ,सेवानिवृत्त यांचा पास आदी सुविधांबद्दल प्रशासनाबरोबर चर्चा होऊन कार्यवाहीचे आदेश ,सूचना मध्यवर्ती कार्यालयाकडून प्रसारित झाल्या आहेत.
एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित आर्थिक तसेच नियमित येणाऱ्या प्रश्नांसंदर्भात विभाग ते राज्यस्तरापर्यंत उपोषण आंदोलन छेडण्यात आले होते. हे आंदोलन मागे घेण्यात आले. त्यावेळी संघटनेवर टीकाही झाली .मात्र, त्याच मान्यताप्राप्त संघटनेने संपानंतर सतत दोन वर्षे कामगार प्रश्नावर कामगार चळवळ चालू ठेवली. कामगारांच्या असंतोषाची जाणीव प्रशासनाला करून दिली. इतर संघटना मात्र नावापुरत्याच राहिल्या. त्यांना कामगारांपेक्षा स्वतःचे हीत महत्त्वाचे वाटले .सत्ताधारी सोबत असूनही काही संघटनांकडुन प्रश्न सुटू शकलेले नाहीत.
त्या संघटनेने एसटी कामगारांची दिशाभूल करून राजकीय पाठिंबावर सहा महिने संप घडवून आणला. बँक ताब्यात घेतली. त्यांना तर कामगारांच्या प्रश्नाबाबत काहीच पडल्याचे दिसत नाही. एसटी कर्मचाऱ्यांना बँकेत कर्ज मिळणे ही बंद झालेले आहे. तिच्या जोरावर बँकेत वारंवार उधळपट्टी सुरू आहे. या साऱ्याचा लेखाजोखा एसटी कामगारांकडे आहे. त्यामुळे मान्यता प्राप्त एसटी कामगार संघटनाच न्याय देऊ शकते याची खात्री कामगारांना झालेली आहे.असेही दिलीप साटम यांनी म्हटले आहे.