सावंतवाडी दि.१२ एप्रिल
काजू बी खरेदी प्रकरणी विद्यमान मंत्री दिपक केसरकर आणि सत्ताधारी भाजप/शिंदे सेना सरकारने बहुसंख्य काजू बागायतदार शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली आहेत, असे उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिल्हा प्रवक्ते डॉ जयेंद्र परुळेकर यांनी म्हटले आहे.
डॉ परूळेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे,जिथे प्रति किलो २०० रुपये हमीभाव मागणी होती तिथे १२५ रूपये अधिक १० रुपये अनुदान असे मोजकेच १३५ रूपये प्रति किलो जाहीर करून सामान्य काजू शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्यात आले आहे.मोजक्या काजू कारखानदार आणि व्यापाऱ्यांचे हित जपण्यासाठी सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यातील अडीच लाख काजू शेतकऱ्यांची निव्वळ फसवणूक करण्यात आलेली आहे.
डॉ परुळेकर म्हणाले,एकेकाळी (आठ दहा वर्षापूर्वी) काजू बी ला १८० रुपये प्रति किलो भाव मिळत असताना मोदी सरकारच्या चुकीच्या आयात निर्यात नितीमुळे आयात कर अचानकपणे दहा टक्क्यांवरून पाच टक्के केला गेला आणि फार मोठ्या प्रमाणावर परदेशी काजू देशात येऊ लागला आणि काजू व्यापाऱ्यांचे तर उखळ पांढरे झाले पण दोन एकरपेक्षा कमी बागायत असलेला बहुसंख्य काजू शेतकरी मात्र देशोधडीला लागला आहे.
जिल्ह्यातील काजू शेतकरी आज कर्जबाजारी होत असताना त्याचे परदेशी काजूच्या अतिक्रमणामुळे सातत्याने आर्थिक शोषण होत आहे.
या सगळ्या प्रकरणात जिल्ह्याचे पालकमंत्री गप्प आहेत.आजच्या महागाईच्या काळात सामान्य काजू शेतकऱ्याला प्रति किलो दोनशे रुपये हमीभाव मिळणे हा त्यांचा हक्क आहे.
मुठभर काजू कारखानदार आणि व्यापाऱ्यांचे हित जपणाऱ्या सत्ताधाऱ्यांना निवडणूक लढण्यासाठी सामान्य काजू शेतकऱ्यापेक्षा धनदांडगे व्यापारीच महत्त्वाचे वाटत आहेत असंच दिसतं आहे, असे उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिल्हा प्रवक्ता डॉ जयेंद्र परुळेकर यांनी म्हटले आहे.