सावंतवाडी दि.१४ एप्रिल
हजारो वर्षांची मनुवादी व्यवस्था म्हणजेच आजची प्रस्थापित व्यवस्था असून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ही व्यवस्था संविधानाच्या फटकार्याने ती परिवर्तित केली. मात्र आज मनुवादी व्यवस्थेने पुन्हा एकदा ही प्रस्थापित व्यवस्था पुन्हा आणण्याचा छुपा प्रयत्न सुरू केला आहे. हा प्रयत्न आंबेडकरी अनुयायानी हाणून पाडण्यासाठी लक्षभेदक व लक्षप्रेरक जागृती करायला हवी त्यासाठी विविध सिद्धांत महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन रत्नागिरीचे बुद्धिस्ट इंटरनॅशनल चे अध्यक्ष संदेश कदम यांनी सावंतवाडी येथे आज आंबेडकर जयंती कार्यक्रमात केले.
सावंतवाडी नगरपालिका व बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार प्रबोधन समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर संविधान प्रेरणा विचार मंचावर आयोजित केलेल्या जयंती कार्यक्रमात “प्रस्थापित व्यवस्थेने बहुजन समाजा समोर ठेवलेल्या समस्या” या विषयावर आयोजित केलेल्या व्याख्यानात श्री. कदम प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समन्वय समितीचे अध्यक्ष केशव जाधव हे होते यावेळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
यावेळी विचार मंचावर समितीचे उपाध्यक्ष जगदीश चव्हाण, सचिव विनायक जाधव, खजिनदार लक्ष्मण कदम, प्रियदर्शनी जाधव, आरोंदा हायस्कूलचे मुख्याध्यापक सिद्धार्थ तांबे, नारायण आरोंकर उपस्थित होते.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत जगदीश चव्हाण यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनायक जाधव यांनी करून समन्वय समितीने केलेल्या विविध कामाचा आढावा घेतला. यावेळी संदेश कदम यांनी सुरुवातीलाच मनुवादी शासन व्यवस्था म्हणजे काय हे सांगून मौर्य काळातील जगाच्या प्रगतीचा आढावा आपल्या उगवत्या भाषेत घेतला.
सध्याचे आरक्षण म्हणजे काय ? ते का देण्यात आले हे त्यांनी सांगून आरक्षण हे सर्वप्रथम हंटर कमिशन च्या समोर महात्मा फुले यांनी बाजू मांडून प्राप्त करून घेतल्याचे सांगून त्यानंतर शाहू महाराजांनी 1902 मध्ये आपल्या संस्थांना सुरू केले हे स्पष्ट केले. आरक्षण हे प्रगतीसाठी असून आरक्षणामुळेच या देशातील जातीयता नष्ट झाल्या चे सांगून यातूनच बारा बलुतेदारी नष्ट झाल्याचे सांगून संविधानामुळेच या देशात समता निर्माण झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र सध्या संविधानच धोक्यात आल्याने ते वाचविण्याची जबाबदारी आंबेडकरी अनुयायांची असल्याचे त्यांनी सांगून आंबेडकरी जनतेने संविधान वाचवण्यासाठी पुढे यावे असे आवाहन त्यांनी केले.
मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना डॉ. बाबासाहेब यांच्या संविधानामुळेच या देशातील विषमता नष्ट होऊन या देशात समता प्रस्तावित झाल्याचे सांगून समता, बंधुता, न्याय यातूनच नव समाजाची घडण होत आहे हे सांगून बाबासाहेब हे घटनेचे शिल्पकार आहेत असे नसून समाजाच्या प्रगतीचेही ते शिल्पकार आहेत हे स्पष्ट केले. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेबांचे विचार हे जयंती पुरते मर्यादित नसून कायम दैनंदिन जीवनात आचरणात आणण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आपल्या राष्ट्र उभारणीच्या कामाला 100% मतदान करून लोकशाही सदृढ करा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
अध्यक्षपदावरून बोलताना केशव जाधव यांनी सर्वांच्या सहकार्यातूनच हा भव्य दिव्य जयंती सोहळा साजरा होत असल्याचे सांगून सर्वांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली व असे सहकार्य करावे असे आवाहन केले. शेवटी शांताराम असणकर यांनी आभार मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सगुण जाधव यांनी केले.
कार्यक्रमाची सुरुवात मुख्याधिकारी सागर साळुंखे व समन्वय समितीचे अध्यक्ष केशव जाधव यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून केल्यानंतर समता सैनिक दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली, तर भारतीय बौद्ध महासभा शाखा सावंतवाडीचे अध्यक्ष बुधाजी कांबळी यांनी त्यानंतर ध्वजवंदन केले. यानंतर त्रिशरण पंचशील ग्रहण करून कार्यक्रमाची रीतसर सुरुवात करण्यात आली. त्यानंतर जयंती दरम्यान करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरातील रक्तदात्यांना व समूहगीत गायन स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र सन्मान चिन्ह मान्यवरांचे हस्ते देऊन त्यांना गौरविण्यात आले.
केंद्रीय मंत्री नारायण राणे, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, अर्चनाताई घारे-परब, विशाल परब, संजू परब, रुपेश राऊळ अशा विविध मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. दरम्यान सायंकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर ते संपूर्ण बाजारपेठेत भव्य भीम रॅली काढून तिचा समारोप डॉक्टर आंबेडकर स्मारकाकडे करण्यात आला दरम्यान सत्यशोधक शाहिरी जलसा सादर करण्यात आला, रात्री विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.