मालवण,दि.१७ एप्रिल
नौदल दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा झाला. राष्ट्रपतींचा प्रोटोकॉल चुकवून हा दौरा झाला अशी टीकाटिपणी करून दिशाभूल करणे चुकीचे आहे. अशा प्रकारचा खेद किंवा टिपणी कोणत्याही नेत्याने केलेली नाही. पंतप्रधानांनी आचरा, देवगड, मिठबाव, विजयदुर्ग अशा गावांची नावे स्पष्टपणे आपल्या भाषणात घेतली. याचा वेगळा अर्थ काढणे चुकीचे आहे. नौदल दिनाचा कार्यक्रम मालवणात होणे हे गौरवाचे असताना भारत देश कसा बलशाही आहे हे दाखविणारे प्रात्यक्षिक असताना याचा नको तो अर्थ काढणे म्हणजे विरोधकांच्या पोटात पोटशुळ आल्यासारखे आहे अशी टीका भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर यांनी पत्रकातून केली.
दरम्यान कोकणपट्टा सिडको कडे देऊन अंबानी अदानीच्या घशात कोकण घालायचे आहे का? पंतप्रधान याची रेकी करण्यासाठी कोकणात आले होते का? असा प्रश्न विचारून दिशाभूल करण्याचा प्रयत्न नितीन वाळके करत आहेत. अशा किती जमिनी कोकणात अंबानी अदानीच्या घशात घातल्या याचे स्पष्टीकरण त्यांनी द्यावे. सिडकोच्या प्रस्तावाला राज्य शासनाने स्थगिती दिली आहे. याबाबत कोणतीही कार्यवाही न होता अकलेचे तारे तोडणे हे पूर्णपणे चुकीचे असल्याचेही श्री. केनवडेकर यांनी म्हटले आहे.
उबाठा सेनेचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी केलेल्या टीकेला श्री. केनवडेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. सुरेश प्रभू हे माझे गुरु आहेत. त्यामुळे गुरुची सेवा करणे यात मला कोणतीही लाज वाटत नाही आणि वाटणारही नाही. पण हरी खोबरेकरांना माझे एक सांगणे आहे २०१४, २०१९ च्या निवडणुकीमध्ये माझ्या प्रभागात शिवसेनेला टेबल लावायला माणूस मिळत नव्हता. पोलिंग एजंट बसायला प्रतिनिधी मिळत नव्हता. त्यावेळी भाजपचा कार्यकर्ता म्हणून आम्ही त्या ठिकाणी बूथ प्रचार टेबल लावले. घरोघरी प्रचारही केला. शिवसेनेचा प्रचार केला यावरून आपल्या घरावर दगडफेकही झाली. त्यामुळे आम्ही काय प्रचार केला हे जनतेला माहिती आहे. मी माझ्या गुरुची सेवा केली आहे. आपण कोणाची सेवा करता हे जग जाहीर आहे. गुरुजी सेवा करताना मला कधी मागच्या दाराने पळून जाण्याची नामुष्की आली नाही.
राजकोट किल्ला पुनर्जीवीत करण्याचे श्रेय पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना जात असताना पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सोबत बसून टिका टिपणी करणारे जेष्ठ कार्यकर्ते हे जेव्हा व्यापारी संघाची सभा असते. त्यावेळी अशा प्रकारचे उपक्रम झाले पाहिजेत म्हणून जाहीर वक्तव्य करतात आणि दुसऱ्या बाजूला राज्यातील देशाचे प्रश्न घेऊन टीकाटिप्पणी करतात हे कितपत योग्य आहे हे आपणच पहावे. सिंधुदुर्ग किल्ल्याचे कोणीही महत्त्व कमी करू शकत नाही आणि ते होऊ शकत नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली राजधानी ही सिंधुदुर्ग किल्ला होती. किल्ल्यावर छत्रपतींचे मंदिर असल्याने लोक तीर्थक्षेत्र म्हणूनच या किल्ल्याकडे पाहत असतात याची पूर्ण जाणीव भाजपला आहे. पण याच किल्ल्याच्या रक्षणासाठी आवश्यक ३२ गड महाराजांनी बांधले होते. त्याचे पुनर्जीवीकरण करण्याचे काम भाजप पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करत आहे. अशी ऐतिहासिक स्थळे पर्यटन दृष्ट्या विकसित झाल्यावर गावोगावी पर्यटन उभे राहील. आर्थिक सुबकतेकडे जिल्हा मार्गस्थ करण्याचा प्रयत्न पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली होत असल्याचे हा जिल्हा पाहत आहे.
सिंधुदुर्ग किल्ल्याला आवश्यक असणारा निधी पालकमंत्र्यांनी विशेष बाब म्हणून मंजूर करून घेतला आहे. सिंधुदुर्ग किल्ल्याला प्रवेशद्वार ते बुरुज याला पूर्ण लाईट व्हावी. पडलेले बुरुज व्यवस्थित करण्यात यावेत. यासाठी भरीव निधी उपलब्ध केला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत शिवराजेश्वर मंदिर, नगारखाना, भवानी मंदिर दुरुस्तीसाठी विशेष निधी देऊन कार्यान्वित केला आहे. मोरयाचा धोंडा येथे होत असणारे सुशोभीकरण याचा आराखडा होत असताना स्थानिक मच्छीमारांना भडकवून आपल्या जमिनी घेतील, विस्थापित करतील असे सांगून हा प्रकल्प कसा होणार नाही यासाठी कोण प्रयत्न करत आहेत. जिल्ह्यातील पहिले सहा किल्ले पुनर्जीवित करण्यासाठी पालकमंत्री शासनामार्फत प्रयत्न करीत आहेत. त्याचबरोबर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नौदलाची माहिती असणारे कलादालन उभारण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत तीन कोटीचा निधी उपलब्ध करून दिला आहे. राजकोट येथे लाईट अँड साऊंड शो होण्यासाठी पालकमंत्री प्रयत्नशील आहेत. यासाठी निलेश राणे आराखडा तयार करून घेत आहेत हे असताना कोकणाशी संबंधित नसणाऱ्या प्रश्नांवर प्रश्न विचारून जनतेचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत. सिंधुदुर्ग किल्ला येथे शिव पुतळ्यासाठी जागा उपलब्ध होता नये यासाठी कोणी प्रयत्न केले हे जग जाहीर आहे. कोकणात रिफायनरी नको असे ठमकावून सांगणारे विरोधक गुजरात मधील अंबानीच्या रिफायनरी येथे होणाऱ्या कार्यक्रमात उपस्थिती दाखवतात याला जनतेने काय म्हणावे असा प्रश्नही श्री. केनवडेकर यांनी उपस्थित केला आहे.
आम्ही खासदारांच्या विकास कामांबद्दल प्रश्न विचारले होते. त्याचे कोणते उत्तर न देता वेगळी उत्तरे देणे हे हास्यास्पद आहे. वसंतराव तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत धनगर वस्तीत पाणीपुरवठा, रस्ते, समाज मंदिर, स्मशानभूमी यासाठी वापरला जाणारा निधी खासदार विनायक राऊत यांच्याकडून केवळ सोलार स्ट्रीट लाईट साठी खर्च करण्यात येत आहे. रस्ते, पाणी या धनगर समाजाच्या मूलभूत गरजा असताना देखील केवळ स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी खासदारांनी आपल्या मर्जीतील एकाच सोलर कंपनीला ठेका दिला आहे याचे स्पष्टीकरण देण्यात यावे असे केनवडेकर यांनी म्हटले आहे.
Home आपलं सिंधुदुर्ग राष्ट्रपतींचा प्रोटोकॉल चुकवून हा दौरा झाला अशी टीकाटिपणी करून दिशाभूल करणे चुकीचे-जिल्हा...