ना.उदय सामंत, किरण सामंत यांनी राणेंना पाठिंबा देण्याची केली घोषणा; जोरदार घोषणाबाजी करत साजरा केला जल्लोष
कणकवली दि. १८ एप्रिल ( भगवान लोके )
रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून अखेर भाजपा , शिवसेना , राष्ट्रवादी ( अजितदादा गट) , आरपीआय , मनसे या महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून केंद्रीय मंत्री तथा माजी मुख्यमंत्री नारायण तातू राणे यांना जाहिर झाली आहे. गेल्या ४४ वर्षानंतर पहिल्यांदाच या लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या कमळ या चिन्हावर नारायण राणे हे लढणार आहेत. या लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री नारायण राणे विरुध्द शिवसेना उबाठा पक्षाचे विनायक राऊत यांच्यात लढत होणार आहे. उमेदवारी जाहीर होताच कणकवलीत भाजपा कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला.तसेच ना.राणे यांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. महायुतीचे उमेदवार म्हणून ना.नारायण राणे उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
कणकवली पटवर्धन चौक येथे फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. त्यानंतर केंद्रीय मध्ये नारायण राणे संपर्क कार्यालय समोर देखील फटाक्यांचे करत नारायण राणे यांचे स्वागत करण्यात आले.यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे ,बँक संचालक समीर सावंत, विठ्ठल देसाई, शहराध्यक्ष अण्णा कोदे, संदीप मेस्त्री,बंडू हर्णे, सुशील पारकर बबलू सावंत, स्वप्निल चिंदरकर,निखिल आचरेकर,राजा पाटकर,जीवन राणे,सोहम गांगण,प्रज्वल वर्दंम आदींसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सिंधुदुर्गसह रत्नागिरीत जल्लोष –
केंद्रीयमंत्री नारायण राणे यांना महायुतीचे अधिकृत उमेदवारी जाहीर होताच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सिंधुदुर्गसह रत्नागिरी जिल्ह्यात फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष केला. कणकवली , कुडाळ , सावंतवाडी , मालवण , रत्नागिरी यासह विविध भागांमध्ये भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी जोरदार भारतीय जनता पार्टीचा विजय असो , नारायण तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है , महायुतीचा विजय असो यासह विविध घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग – रत्नागिरी दोन्ही जिल्ह्यांमध्ये भाजपच्या जिल्हा , तालुका विभागवार सभा घेतल्या. त्या बैठकांमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधत ही निवडणूक विकासाच्या मुद्दयावर लढवतो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिस-यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी या लोकसभा मतदार संघातून महायुतीचा खासदार माझ्या रुपाने विजयी झाला पाहिजे. त्यासाठी गावातील प्रत्येक माणसांशी , शासनाच्या लाभार्थ्यांना भेटून केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून होत असलेली विकासकामे सांगा , असे आवाहन ना. नारायण राणे यांनी बैठकांमधून भाजपा कार्यकर्त्यांना केले आहे.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग दोन्ही जिल्ह्यांमध्ये नारायण राणे यांचे अधिकृत नाव घोषित होतात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. उद्या १९ एप्रिल रोजी भव्य दिव्य मिरवणुकीने रत्नागिरीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे.