तळेरे,दि.२० एप्रिल
करिअर म्हणजे नेमक काय ते आपण ठरविले पाहिजे. आयटी,इंजिनिअरींग,मेडिकल क्षेत्रात जाऊन मोठमोठी पॅकेज आणि पैसे मिळविणाऱ्या नोकऱ्या म्हणजे करिअर मुळीच नाही. माझ्या दृष्टीने हे फसव करिअर आहे. आपण आपल्या समाधानासाठी,कुटुंबासाठी आणि समाजासाठी काही तरी देणं लागतो याचा समतोल राखून कुठल्याही क्षेत्रात आनंदाने आणि समाधानाने जे काम करतो ते खरं करिअर असते. सामाजिक जबाबदारी स्विकारुन डॉ.नेरुरकर खास अमेरिकेतून आपल्या जिल्ह्यात येऊन अशा प्रकारे युवा पिढीला चांगला मार्ग दाखविण्याचे कार्य गेली दहा वर्षे सातत्याने करीत आहेत.तशी कर्तव्याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे. माझ्या सारखा सर्वसामान्य बॅकबेंचर्स जीवनात यशस्वी करिअर करु शकतो तर तुम्हाला देखील करिअरच्या नवनवीन वाटा शोधता आल्या पाहिजेत असे प्रतिपादन दै.तरुण भारत संवादचे संपादक शेखर सामंत यांनी केले.
तळेरे येथील प्रज्ञांगण आयोजित करिअरच्या वाटेवर या निवासी कार्यशाळेत विविध मान्यवरांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. या कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या कार्यशाळेचे उद्घाटन डॉ.अनिल नेरुरकर एम्.डी.(अमेरिका), दै.तरुण भारत संवादचे संपादक शेखर सामंत यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने तळेरे येथील “स्मित लाॅन्स” येथे संपन्न झाला. यावेळी तळेरे पंचक्रोशी पत्रकार मित्र परिवाराचे अध्यक्ष उदय दुधवडकर, आयोजक सतीश मदभावे, सौ.श्रावणी मदभावे, पत्रकार निकेत पावसकर, राजापूर अर्बन बँक तळेरे शाखेचे शाखा व्यवस्थापक दुर्गेश बिर्जे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यशाळासाठी जिल्हाभरातील 76 मुला व मुलींनी सहभाग घेतला होता.
या कार्यशाळेसाठी मार्गदर्शक म्हणून सकाळच्या सत्रात दै.तरुण भारतचे संपादक शेखर सामंत यांनी ‘झिरो से हिरो तक’ या विषयावर आपल्या आयुष्यातील जीवनक्रम मुलांसमोर उलगडला. तसेच जीवनात यशस्वी होण्यासाठी आणि करिअर करण्यासाठी कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत याविषयी उद्बोधक मार्गदर्शन केले. यानंतर डॉ.अनिल नेरुरकर यांनी विद्यार्थ्यांना ‘इंग्लिश कम्युनिकेशन स्किल’ आणि त्यातील महत्त्व यावरती मार्गदर्शन केले.
दुपार सत्रामध्ये मानसोपचार तज्ञ श्रीमती मंजिरी घेवारी यांनी विद्यार्थ्यांना ‘स्ट्रेस मॅनेजमेंट’ या विषयावर उत्साह पूर्ण मार्गदर्शन केले. त्यानंतर पोंभुर्ले गावचे सुपुत्र आणि गुरुकुल करिअर अकॅडमीचे प्राध्यापक अजित जांभेकर यांनी ‘स्पर्धा परीक्षा आणि कोकणातील तरूणांची आवश्यक मानसिकता’ या विषयावर मार्गदर्शन केले.
सायंकाळच्या सत्रात चित्रकार उदय दुधवडकर यांनी विद्यार्थ्यांना ‘कार्टून आर्ट’ या विषयावरती मनोरंजनात्मक मार्गदर्शन केले.
त्यानंतर डॉ.अनिल नेरुरकर यांनी ‘यश गाठूया मोठे होऊया’ तसेच ‘बोलेल तोच जिंकेल’ या विषयावरती विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, मी यशस्वी होणारच त्यासाठी आता पासून तयारी केली पाहिजे. गुणवत्ता दर्जा वाढवायला हवा.ध्येय गाठणे सोपे असते.त्यासाठी चांगला मार्गदर्शक निवडा शोधा आणि पुढे जा. नियमित अभ्यास करा. आपल्याला कशात संधी आहेत ते शोधता आले पाहिजे. त्यासाठी अंतर मनातून प्रबळ इच्छाशक्ती असली पाहिजे. म्हणून ध्येय निश्चित करा. ज्ञान साधना,मेहनत,गुणवत्ता दर्जा,आत्मविश्वास हे गुण स्वीकारले पाहिजेत. त्याचबरोबर
संभाषण कला अवगत केली पाहिजे. त्यासाठी आपली भाषा चांगली समृद्ध करा.आवडीचे क्षेत्र निवडा,आवड नसेल तर ती निर्माण करा. ती गोष्ट मनापासून करा. नुसत्या डीग्री घेऊन बाहेर पडू नका. बाहेर पडून वेगळा विचार करा.आपला दृष्टीकोन बदला. देव आपल्यामध्येच दडलेला आहे.आनंद घ्यायल शिका. मनात भीती आणि आत्मविश्वास कमी असतो.जिथे भिती असते तिथे कृती नसते. जिथे कृती नाही तिथे यश नाही. पहिली मनातील भीती काढा आणि नेहमी सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. कोणतेही काम करत असतांना टीम वर्क आवश्यक असतो. जीवनात मोठी स्वप्न बघायला शिका.आकलन शक्ती महत्त्वाची,व्यवहार चातुर्य आवश्यक असते. यश म्हणजे पैशे नव्हते,प्रतिष्ठान महत्त्वाची. अपयश येणारच प्रयत्नातून यश मिळते. परिश्रम,ध्यास असायला हवा तो कधीच सोडायचा नाही. यश तुमच्या मागून धावत येईल असा विश्वास डॉ.नेरुरकर यांनी यावेळी व्यक्त केला.
रात्रीच्या शेवटच्या सत्रात माजी आमदार प्रमोद जठार यांनी विद्यार्थ्यांसोबत गप्पा टप्पा या विषयाला हात घालत दिवसभरात झालेल्या प्रत्येक सेशन बद्दल विद्यार्थ्यांची हितगुज साधले आणि विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वीतेसाठी आवश्यक मूलमंत्र देतांना म्हणाले की, पुस्तकासारखा जिवलग मित्र आणि मार्गदर्शक कोणीही नाही. पुस्तकेच तुम्हाला शिकवतील, पुस्तकेच मार्गदर्शन करतील. यासाठी प्रत्येकाने वाचनालयात गेले पाहिजे आणि प्रचंड वाचन केले पाहिजे. एक निश्चिय करा आजपासून मी पुस्तके वाचणार. त्यासाठी आवड निर्माण झाली पाहिजे. आत्मचरित्र वाचा.आताच तुम्हाला वेळ आहे. जो वेळेला महत्त्व देतो तो आयुष्यात पुढे जातो. पुस्तके वाचल्याशिवाय पर्याय नाही. आपले कौशल्य ओळखा.आपल्याला येणाऱ्या प्रत्येक संकटाला सामोरे जायला शिका.माणूष्य जन्म स्पेशल आहे.आयुष्याचे सगळे टप्पे छान पैकी सजवा.आपणच आपल्या आयुष्याचे शिल्पकार आहोत. फिटनेस जपा. त्यामुळे तुम्हाला चांगले आरोग्य लाभेल. आपणच आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी तुम्ही स्वतःला ओळखा.गरीबी वरदान आहे. जो संघर्ष करतो तोच शुन्यातून विश्व निर्माण करतो.ज्या गोष्टी तुमच्या हातात नाही त्याचे दु:ख बाळगू नका. असे प्रमोद जठार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.
रात्री जेवणानंतर सर्व विद्यार्थ्यांनी प्रसिद्ध संदेश पत्र संग्राहक आणि नाणी संग्राहक निकेत पावसकर यांच्याकडून त्यांच्या जीवनात त्यांनी जोपासलेल्या छंदाबद्दल जाणून घेतले तसेच त्यांच्याकडील दुर्मिळ ऐतिहासिक नाण्यांचा संग्रह देखील प्रत्यक्ष हाताळून अनुभवला, यामुळे विद्यार्थ्यांना एक ऐतिहासिक अनुभूती मिळाली.
मुलांसाठी गेली दहा वर्षे कार्यशाळा
जिल्ह्यातील मुले पुढे जावीत, व्यक्तिमत्व विकास व्हावा, परंपरागत असलेली मानसिकता बदलावी यासाठी डॉ.अनिल नेरुरकर यांच्या माध्यमातून गेली दहा वर्षे सातत्याने तळेरे परिसरात निवासी कार्यशाळा होत आहेत. त्यासाठी डॉ.नेरुरकर खास अमेरिकेतून येऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात.
दुसऱ्या दिवशी सकाळी दळवी महाविद्यालयाचे प्राध्यापक प्रशांत हटकर यांनी विद्यार्थ्यांना मनःशांती व ध्यानधारणेचे महत्त्व पटवून देऊन त्याची गरज याविषयी मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांकडून ध्यान धारणा करून घेतली.
त्यानंतरच्या सत्रात सिनेअभिनेत्री अक्षता कांबळी सिनेनाट्य क्षेत्रातील करिअरच्या विविध वाटा याविषयी आपला प्रवास आणि संधी याबद्दल मार्गदर्शन केले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणाली मांजरेकर, सतीश मदभावे, सौ.श्रावणी मदभावे यांनी केले.