इंडियन इन्स्टिट्युट ऑफ टुरिझम अँड ट्रॅव्हल्स मॅनेजमेंट व नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ वॉटरस्पोर्ट्स यां दोन संस्था सिंधुदुर्ग व रत्नागिरीमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करणार
मालवण,दि.२२ एप्रिल
सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा असला तरी प्रत्यक्षात पर्यटनाला शास्त्रीय जोड देणे आवश्यक आहे, तसे योग्य नियोजन केले पाहिजे. तारकर्ली देवबाग, मालवण येथे होणाऱ्या वॉटरस्पोर्ट्सला राजमान्यता व व्यवसायिकांना आवश्यक परवाना मिळवून देणे गरजेचे असून ते देणारी योग्य अशी यंत्रणा स्थापना झाली पाहिजे. यासाठीच आपण इंडियन इन्स्टिट्युट ऑफ टुरिझम अँड ट्रॅव्हल्स मॅनेजमेंट व नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ वॉटरस्पोर्ट्स यां दोन संस्था सिंधुदुर्ग व रत्नागिरीमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, वॉटरस्पोर्ट्स साठी आवश्यक सेवा सुविधा देण्याबरोबरच राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षित करून सुविधा देण्याचाही प्रयत्न आपण करणार असल्याचे प्रतिपादन इंडिया महाविकास आघाडीचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांनी कालेथर येथे बोलताना केले
यावेळी शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, उपनेते गौरीशंकर खोत , संग्राम प्रभुगावकर, हरी खोबरेकर,काँग्रेस मालवण तालुकाध्यक्ष मेघनाथ धुरी,बाळू अंधारी आगोस्टीन डिसोझा मंदार केणी,बाबी जोगी, नितीन वाळके, दीपा शिंदे, श्वेता सावंत, मंदार ओरसकर, किरण वाळके, निनाक्षी शिंदे पल्लवी तारी खानोलकर , भगवान लुडबे , मेघनाद धुरी तळगावकर, प्रवीण लुडबे, यांसह शिवसेना,इंडिया- महाविकास आघाडीचे पदाधिकारी, शिवसैनिक नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना खासदार विनायक राऊत म्हणाले, केंद्र सरकारने पर्यटन विकासासाठी स्वदेश दर्शन योजना आखली, आपण पंतप्रधानांच्या मागे लागून यां योजनेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश करून घेतला, यां योजनेत समाविष्ट होणारा सिंधुदुर्ग पहिला जिल्हा आहे. यासाठी माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू व गोव्याचे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचे सहकार्य लाभले. या योजनेतून जिल्ह्यासाठी त्यावेळी १७ कोटीचा निधी जिल्ह्याला मिळाला. मात्र दुर्दैवाने त्यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर होते. हा निधी खर्च होत नसल्याने आपण व वैभव नाईक यांनी जिल्हा नियोजन बैठकीत सातत्याने प्रश्न मांडले. त्यावेळी या निधीतून जिल्ह्याच्या किनारपट्टी गावात शौचालये बांधण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मात्र आपल्याला कुठेही ही शौचालये दिसली नाही. त्यावर अमावस्येच्या समुद्री उधाणात ही शौचालये वाहून गेली असे अधिकाऱ्यांनी सांगितले. केसरकर व अधिकारी यांच्यामुळे यां योजनेची वाट लागली अशी टीका राऊत यांनी केली.
ते पुढे म्हणाले, स्वदेशी दर्शन योजनेच्या दुसऱ्या टप्प्यावरून मालवण मधील भाजपचे एक मोठे नेते ज्यांनी नौदल दिन कार्यक्रमात पंतप्रधानांच्या नावावर करोडो रुपयांचा भ्रष्टाचार केला ते मला इशारा देत आहेत. नौदल दिन कार्यक्रमासाठी मालवणात आलेल्या पंतप्राधनांकडून जिल्ह्याला काहीतरी मिळेल अशी अशा येथील जनतेला होती. मात्र पंतप्रधान फक्त भाषणबाजी करून गेले. पंतप्रधान साडे सात हजार कोटी किमतीच्या विमानातून येथे आले, साडे सात हजार कोटी नको, पण केवळ सातशे कोटी जरी जिल्ह्यासाठी दिले असते तरी पुरे होते अशी खोचक टीका राऊत यांनी केली. तसेच नौदल दिनासाठी मालवणात ८ कोटी रुपये खर्चून हेलिपॅड बांधली गेली, कार्यक्रमानंतर हेलिपॅडचे डांबरही उखडून नेले, यां हेलीपॅडना सोने लागले होते काय ? अशी टीका राऊत यांनी करत हेलीपॅड च्या नावाखाली पैसे खायची कामे करण्यात आली असा आरोपही त्यांनी केला.
यावेळी खासदार राऊत यांनी भाजपच्या माध्यमातून कोकण किनारपट्टीला मोठा धोका निर्माण झाला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोकण किनारपट्टीवरील गावांना सिडको प्राधिकरण च्या घशात घालणार असून यातून येथील जमिनी परप्रांतीयांना विकल्या जाणारा आहेत. उद्या तुमचे घर आणि भूमी वाचविण्यासाठी भाजपचे दलाल नेते येणार नाहीत, तेव्हा येणार फक्त विनायक राऊत आणि वैभव नाईक. म्हणूनच यां जिल्ह्याच्या भल्यासाठी जनतेने मशाल हाती घेऊन मला मतरुपी आशीर्वाद द्यावा, असे आवाहन त्यांनी केले
यावेळी बोलताना आम. वैभव नाईक यांनी आज किनारपट्टी भागातील पाण्याचा प्रश्न आम्ही सोडवत आहोत, बंधारे मंजूर केले. यां भागात तौक्ते वादळ आले तेव्हा सुदैवाने उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते. यां भागात आठ दिवस लाईट नव्हती. उद्धव ठाकरे यांनी सर्व यंत्रणा कामाला लावली, नुकसानग्रस्ताना मदत देण्याचे काम केले. त्यावेळी नारायण राणे केंद्रात मंत्री होते, केंद्र शासनाकडून येथील नुकसान ग्रस्तांसाठी एक रुपया तरी मदत आली का हे राणे यांनी सांगावे, असेही नाईक म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी मालवणात आल्यावर येथे काय फरक पडला. येथे कोटी रुपये खर्चून बनवलेली हेलिपॅड आठ दिवसात पुन्हा उखडून टाकण्याची घटना प्रथमच भारतात घडली. आज सर्वजण भाजपसमोर झुकले गेले आहेत, मात्र उद्धव ठाकरे झुकले नाहीत, त्यांनी मराठी माणसांचा लढा सुरूच ठेवला आहे. आम्हांलाही अनेक आमिषे दाखवली गेली, मात्र आम्ही त्यास बळी पडलो नाही. कारण सर्वसामान्य जनतेने आम्हाला निवडून दिले आहे, याची जाण आम्हाला आहे. आज ज्या काही समस्या निर्माण झाल्या आहेत त्यावर एकच उपाय म्हणजे जनतेने निवडणुकीत मशाल चिन्हावर बटण दाबावे, देशात इंडिया आघाडीचे सरकार येईल, विनायक राऊत हे प्रचंड मतांनी पुन्हा खासदार बनतील, असेही आम. नाईक म्हणाले.
शेवटी हरी खोबरेकर यांनी आभार मानले