कोकण किनारपट्टीवर सिडको प्राधिकरण आणून सरकार जमिनी गिळंकृत करण्याच्या तयारीत

जांभा दगड जमीनी गुजराथ्यांच्या घशात घालण्याचा प्रयत्न सरकारचा-खास.विनायक राऊत

सावंतवाडी दि.२३ एप्रिल 
कोकण किनारपट्टीवर सिडको प्राधिकरण आणून सरकार जमिनी गिळंकृत करण्याच्या तयारीत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक लाख हेक्टर तर कोकण किनारपट्टीवर सहा लाख हेक्टर क्षेत्रावर सिडको प्राधिकरण स्थापन केले आहे. तसेच जांभा दगड जमीनी गुजराथ्यांच्या घशात घालण्याचा प्रयत्न सरकारचा आहे. यावर नारायण राणे व दिपक केसरकर यांनी बोलावे असे आवाहन इंडिया महाविकास आघाडीचे ठाकरे शिवसेना उमेदवार खासदार विनायक राऊत यांनी तळवडे येथे केले.

इंडिया महाविकास आघाडीचे उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांच्या प्राचारार्थ तळवडे , माजगाव जिल्हा परिषद मतदार संघाची सभा तळवडे येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी उमेदवार खासदार विनायक राऊत बोलत होते. यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले,ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते ,महिला जिल्हा संघटक जान्हवी सावंत, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख,ठाकरे शिवसेना मतदार संघाचे संपर्कप्रमुख शैलेश परब,तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, समन्वयक बाळा गावडे, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते विकास सावंत,अँड दिलीप नार्वेकर, रमेश गावकर,समीर वंजारी, चंद्रकांत कासार, शब्बीर मणीयार,पुंडलिक दळवी,मायकल डिसोझा, कौस्तुभ गावडे, महेंद्र सांगेलकर, सचिन पालव, भारती कासार, सौ साक्षी वंजारी , भूषण बादीवडेकर अशोक परब आदी उपस्थित होते.

ठाकरे शिवसेनेचे उमेदवार खासदार राऊत म्हणाले, तळवडे चे सुपुत्र कै प्रकाश परब चांदा ते बांदा योजनेतून जिल्ह्यासाठी काम करण्याची संधी चे नियोजन करतानाच अकाली निधन झाले त्या दिवशी माझ्या सोबत होते. कै परब यांच्या नावाने रूग्णवाहीका देण्याचे नियोजन झाले. ती खासदार म्हणून विजयी झाल्यानंतर लोकार्पण करण्यात येणार आहे.केसरकर यांना पंचतारांकित हॉटेल पाहिजेत, या मतदारसंघातील लहान लहान हाॅटेल मध्ये झोपू शकत नाही. त्यामुळे व्हॅनिटी व्हॅन वापरतात.
राऊत म्हणाले, दोडामार्ग मध्ये दिपक केसरकर यांनी दिलेल्या बकऱ्या मेल्या. त्यांनी रडून सांगितले. लातूर मधील रोगीष्ट बकऱ्या मतदार संघात दिल्या. चांदा ते बांदा योजनेतून शेळ्या बकऱ्या, कोंबड्या दिल्या त्या गेल्या कुठे? असा प्रश्न उपस्थित केला.दिपकभाई तुम्ही नारायण राणे यांची चाकरी करा पण उद्धव ठाकरे व आदीत्य ठाकरे येत आहेत त्यांना आवाहन देण्याच्या भानगडीत पडू नका. मी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणले. त्याला जोडून लॅब सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणली त्यासाठी दीड एकर जमीन हवी होती,पण ती उपलब्ध करून दिली नाही त्यामुळे ती सोलापूर ला गेली. सावंतवाडी चे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल केव्हा होणार आहे. आम्ही वेत्ये येथे ग्रामपंचायत ठिकाणी नेण्याचा प्रयत्न केला. पण केसरकर यांनी रडगाणे सुरूच ठेवले. केसरकर आता नक्की लिहून द्या, किती दिवसांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल होणार आहे.

राऊत म्हणाले,आंबा काजू बोर्ड झाले पाहिजे म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आर्थिक तरतूद करुन आंबा काजू बोर्ड स्थापन केले पण ते पुढे अंमलबजावणी केली नाही.
कोकण किनारपट्टी वरील काही ग्रामपंचायती सिडकोच्या ताब्यात देऊन नागरिकांना धोका दिला. मी मंत्री झालो तर नारायण राणे यांच्याकडे असलेले सुक्ष्म लघु उद्योग मंत्रालय घेऊन विकास करणार आहे. राणे यांच्या मंत्रालयात भरपूर अधिकार आहे. पण राणे यांना खात्याचे महत्व कळले नाही.मराठा, धनगर, ओबीसी आरक्षण प्रश्नावर लोकसभेत आवाज उठवला. सर्व स्तरातील मागण्या लावून धरले. महसूल मंत्री नारायण राणे यांनी ४२ हजार हेक्टर जमीन वनसंज्ञेचा निर्णय घेतला. आंबोली कबुलायतदार गावकर जमीनीवर कोणाकोणाची जमीन आहे. ते दिपक केसरकर बोलायला लावू नका. नारायण राणे यांची दिपकभाई चाकरी करा पण जनतेला फसवू नका.कोकण रेल्वे भारतीय रेल्वे मध्ये समावेश, सावंतवाडी टर्मिनस ला प्रा मधू दंडवते यांचे नाव टर्मिनसला द्यवेच लागेल. दुपदरीकरण करून प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे. कोकण रेल्वे परप्रांतीयांच्या घशात घालू देणार नाही.
यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, काँग्रेस नेते विकास सावंत,संजय पडते, जान्हवी सावंत, अँड दिलीप नार्वेकर आदींनी विचार मांडले.