मोदींच्या ‘विकसित भारत,आत्मनिर्भर भारत’ संकल्पाला पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी प्रयत्न करूया

….या उपकाराची परतफेड ही मी येथील विकासाच्या पूर्ततेने पूर्ण करणार-मंत्री तथा महायुतीचे उमेदवार नारायण राणे

सावंतवाडी दि.२३ एप्रिल

मोदींच्या ‘विकसित भारत,आत्मनिर्भर भारत’ संकल्पाला पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा त्यांना पंतप्रधान करण्यासाठी प्रयत्न करूया.देशात त्यांच्या विकासाची लाट आहे.त्या विकासाच्या लाटेत कोकणातही विकासाची गंगा आणूया.तुमचं माझ्यावर प्रेम आहे.उपकार आहेत.हे उपकार मी विसरणार नाही.या उपकाराची परतफेड ही मी येथील विकासाच्या पूर्ततेने पूर्ण करणार आहे.तुम्ही आज याठिकाणी दाखवलेली उपस्थितीच माझ्या विजयाची ‘गॅरंटी’ आहे असा विश्वास केंद्रीय मंत्री तथा महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी व्यक्त केला.यावेळी ना.राणे उपस्थितांची लाक्षणीय गर्दी पाहून भावुक झाले.
माडखोल जिल्हा परिषद महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्यात ना.राणे बोलत होते.
ना.राणे पुढे म्हणाले,काम करावं तर असे करावं की ते कायमचं लक्षात राहील.आज पर्यंत या जिल्ह्यात किंबहुना तुमच्या या ग्रामीण भागात विकासात्मक अनेक कामे केली.त्यामुळे तुम्ही मला मतदान करणार हे नक्की आहेच.पण विरोधकांनाही तुम्ही सवाल केला पाहिजे की गेल्या दहा वर्षात तुम्ही काय केलं? कुठल्या आधारावर मते मागताय?.याठिकाणी रवींद्र मडगावकर यांनी ८० टक्क्यांपेक्षा जास्त मताधिक्य देऊ असे सांगितले.हे ऐकून मन भरून आलंय.कोकणी माणूस प्रेम करतो ते त्यांनी पाहिलंय.आता तुमच्या रोषाचाही सामना त्यांना करावा लागेल,अशा पद्धतीने कामाला लागा असे आवाहनही ना.राणे यांनी केलं.
ना.राणे यांनी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या भाषणाचा धागा पकडत दीपक केसरकर यांचे भाषण विषयाला धरून आणि माझ्या उमेदवारीला पोषक असल्याचे सांगत त्यांच्या भाषणाचे कौतुक केले.
ना.राणे पुढे म्हणाले,मी या जिल्ह्यासाठी गेल्या ३४ वर्षांत केलेल्या कामाच्या पाच टक्के तरी काम या खासदाराने दहा वर्षात केलंय का?केवळ राणेंच्या परिवारावर टीका,नरेंद्र मोदी,अमित शहा,देवेंद्र फडणवीस या भाजप नेत्यांवर टिका करण्याचंच काम हे करीत आहेत.उद्धव ठाकरे हा स्वार्थी माणूस आहे.म्हणूनच एकनाथ शिंदे यांना ४० आमदारांसह बाहेर पडावं लागलं.आता टिका करत आहेत.आमचे ३०० च्या वर खासदार आहेत आणि तुझे केवळ पाच. तेही या निवडणुकीनंतर असणार नाहीत असा टोलाही त्यांनी लगावला.कोरोना काळात व्हॅक्सिन साठी पाठवलेला पंतप्रधानांच्या निधीतून औषधांवर पंधरा टक्के कमिशन मागणारे मोदींवर टिका करतात.हे आम्ही सहन करणार नाही.आता प्रचारासाठी सिंधुदुर्गात ठाकरे येतायत.पण इथे येऊन आमच्या नेत्यांवर नाहक आणि खालच्या पातळीवर जर टिका केली तर परतीचा मार्ग कोठून आहे हे शोधण्याची वेळ येईल असा इशारा ना.राणे यांनी दिला.
या मतदार संघातील युवकांना रोजगार मिळावा,येथे समृद्धी यावी यासाठी आम्ही काम करतोय.त्यामुळेच मला मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री पद मिळालं.माझ्याकडं आतापर्यंत दहा पदे आली.एवढी पदे कोणीही भूषवली नसतील.ही निवडणूक म्हणजे राष्ट्राची निवडणूक.त्यामुळे खोट्या अपप्रचार करणाऱ्यांना रोखा आणि विकासाची स्वप्ने पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या मोदींच्या संकल्पाला साथ द्या असेही ते म्हणाले.