न्यू इंग्लिश स्कूल, उभादांडा शाळा प्रकरण
वेंगुर्ला, दि.२७ एप्रिल
राज्याचे शिक्षणमंत्री आणि आमदार दीपक केसरकर यांच्या विधानसभा मतदार संघात येणा-या उभादांडा गावातील शेकडो लोकांनी येत्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा मोठा निर्णय घेतला असून त्या सबंधीचे निवेदन आणि समर्थनार्थ शेकडो मतदारांच्या सहीचे पत्र २६ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.
वेंगुर्ला-उभादांडा या गावात असलेल्या आणि १९६३ सालापासून अस्तित्वात असलेल्या ‘न्यू इंग्लिश स्कूल, उभादांडा‘ या एकमेव माध्यमिक शाळेत आजमितीला उभादांडा गावातील आणि आजूबाजूच्या गावातील शेकडो गोरगरीब विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. गेली १६-१७ वर्षे शालांत परीक्षेला शंभर टक्के निकालाची परंपरा शाळेने जपली आहे. रेडी रेवस राज्यमहामार्गपासून अवघ्या ८० मीटर अंतरावर असलेल्या या विद्यालयात विद्यार्थ्याना आणि शिक्षकांना सन २०२० पर्यत पुरेसा रस्ता शाळेत जाण्या-येण्यासाठी उपलब्ध होता. मात्र कोविड काळात शाळा बंद असल्याची संधी साधून काही समाज कंटकांनी या जाण्या-येण्याच्या संपूर्ण रस्त्यावर झाडांची लागवड करून आणि बेकायदेशीर बांधकामे करून तसेच सांडपाण्याचा चिखल करून गावातील विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना त्रास देण्याचा जणू विडाच उचलला आहे.
या बेकायदेशीर कृत्याविरोधात शाळा संस्थेने सावंतवाडी प्रांत कार्यालयात केलेला अर्ज अजून निकाली काढला गेला नाही. शाळेने पोलीस प्रशासन, तहसीलदार, स्थानिक आमदार दीपक केसरकर, तत्कालीन पालकमंत्री उदय सामंत, पालकमंत्री रविद्र चव्हाण, खासदार विनायक राऊत यांना वेळोवेळी निवेदने देऊन आणि तक्रारीकरुन सुद्धा कोणतीही कारवाई प्रशासन किंवा कोणत्याही लोकप्रतिनिधीकडून करण्यात आलेली नाही. अशा परिस्थितीमध्ये आज मुलांना त्याच झाडीझुडूपातून वाट काढत शाळेत जावे लागत आहे. अशा स्थितीमध्ये शाळेत जाताना मुलांना इजा होण्याची तसेच त्यांच्या जीविताला धोका पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही.
१ मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा होत असताना मुलांना, शिक्षकांना आणि ग्रामस्थांना आणि ध्वजरोहणासाठी सन्मानाने शाळेत जाणेसुद्धा मुश्किल होऊन बसले आहे. या संपूर्ण प्रकारामुळे उभादांडा गावात आणि पर्यायाने संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात न्याय आणि प्रशासन अस्तित्वात आहे की नाही असा प्रश्न विचारला जात आहे.
याच प्रश्नाची दखल प्रशासन आणि सर्व लोकप्रतिनिधी यांनी घ्यावी या मागणीसाठी उभादांडा गावातील या शाळेत शिकणा-या विद्यार्थ्यांचे पालक, शाळेचे माजी विद्यार्थी आणि संपूर्ण गावातील शिक्षणप्रेमी जनतेने शेकडो सह्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना सादर केले आहे.
या संपूर्ण प्रकरणाचा निकाल लागून येत्या १ मे रोजी होणा-या ध्वजारोहण कार्यक्रमापूर्वी शाळेच्या विद्यार्थ्यांना, शिक्षकांना आणि ग्रामस्थांना शाळेत जाण्यासाठी रस्ता उपलब्ध न झाल्यास ७ मे २०२४ रोजी होणा-या लोकसभा निवडणुकीवर संपूर्ण बहिष्कार घालण्याचा निर्णय या निवेदनाच्या पत्रातून जिल्हा प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधी यांना कळविण्यात आला आहे.
देशाचे माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी प्रत्यक्ष भेट दिलेल्या आणि गौरविलेल्या या शाळेतील मुलांची गैरसोय १ मे च्या ध्वजारोहण कार्यक्रमापूर्वी दूर करून जिल्हाप्रशासन आणि संपूर्ण जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उभादांडा गावच्या शिक्षणप्रेमी जनतेला न्याय देतात का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.