म्हणूनच अमित शहांनी आपली सभा रद्द केली- खा. विनायक राऊत

कणकवली दि.२८ एप्रिल(भगवान लोके)

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचा पराभव होणार असल्याचे केंद्रीयगृहमंत्री अमित शहा यांनी 24 एप्रिलची आपली जाहीर सभा रद्द केली, असा गंभीर आरोप मविआचे उमेदवार तथा खासदार विनायक राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना केला. रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात इंडिया आघाडीतील घटक पक्ष माझा जोरदार प्रचार करीत असून मी गत निवडणुकीतील घेतलेल्या लीडपेक्षा यंदा जास्त लीड घेऊन निवडून येणार असल्याचा दावा राऊतांनी केला. सिडकोच्या माध्यमातून महायुतीचे सरकार कोकणातील जमिनी हडप करीत आहे, असा आरोप राऊतांनी केला.
रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे स्थानिक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते माझा घरोघरी जोरात प्रचार करीत आहेत. प्रचाराच्यानिमित्ताने मी आजपर्यंत 126 सभा घेतल्या आहेत. खळा बैठकांमधून मी माझा प्रचार करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मविआ सरकारने शेतकर्‍यांची कर्जमाफी केली. तौक्तेसह अन्य नैसर्गिक आपत्तीमुळे नुकासानग्रस्त कोकणवासीयांना जास्तीची मदत दिली. राज्यात 5 नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये मंजूर करून ती उभी राहण्यासाठी कोट्यवधीचा निधी दिला. मविआ सरकारने जनतेच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विसर पडला आहे. सिंधुदुर्ग साठी मंजूर झालेली कॅब लँब राणेंनी स्वतःच्या वैद्यकीय महाविद्यालयातील लँब चालावी याकरिता ती रद्द करून सोलापुराला पाठवली, राणेंनी केलेल्या या पापाबाबत फडवणीस यांनी राणेंना याबाबत विचारणा करावी, असा टोला राऊतांनी लगावला.