सावंतवाडी दि.२८ एप्रिल
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ राजापूर येथे झालेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचार सभेत खुद्द उमेदवार तथा कॅबिनेट मंत्री नारायण राणे यांनी कोकणात बेरोजगारी असल्याची कबुली दिली तर मग तुम्ही गेले पावणेतीन वर्षे केंद्रात सुक्ष्म लघु उद्योग कॅबिनेट मंत्री होता तसेच गेली तीस वर्षे मंत्री, मुख्यमंत्री, विरोधीपक्षनेते ,आमदार आणि राज्यसभेचे खासदार होता यावर तुम्ही काय केले? किती कारखाने ? किती प्रकल्प आणले याचे उत्तर जनतेला द्यावेच लागेल असा टोला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रवक्ते, माजी नगरसेवक डॉ जयेंद्र परुळेकर यांनी लगावला.
जर्मनीत नोकरी देण्याची मंत्री दीपक केसरकर यांची घोषणा पोकळ असून निवडणुकीच्या तोंडावर त्यांची अशा घोषणा करण्याची सवय आणि फसवा चेहरा जनता ओळखून आहे.
ते सावंतवाडी येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
कोकणात बेरोजगारी आहे असे नारायण राणे यांनी राजापूरच्या दोन दिवसांपूर्वीच्या जाहीर सभेत जनतेला संबोधित करताना सांगितले, मात्र स्वतः पावणे तीन वर्ष केंद्रीय कॅबिनेट मंत्री होतात तर मग या ठिकाणी उद्योग का उभे राहू शकले नाहीत असा सवाल ठाकरे सेनेचे प्रवक्ते जयेंद्र परुळेकर यांनी आज उपस्थित केला.
दरम्यान मंत्री दीपक केसरकर येथील मुलांना आपण जर्मनी भाषा शिकवणार असे सांगत आहेत, चार हजार बड्या पगाराच्या नोकऱ्या जर्मनीत देणार असल्याचे आश्वासन दिले आहे मात्र त्यांचे हे पोकळ आश्वासन निवडणुकीच्या तोंडावर आहे. निवडणुका झाल्यावर रात गयी बात गई असा टोला श्री परूळेकर यांनी मंत्री केसरकर यांना लगावला.
केंद्रीय लघु सूक्ष्म मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी स्वतःच कोकणातील बेरोजगारी बद्दल बोलले व बेरोजगारी असल्याचे मान्य केले मात्र त्यांनी आपल्या खात्यामार्फत या बेरोजगारीवर कोणत्याही प्रकारची उपाय योजना केलेली नाही. मोदी सरकार ने राज्यातील मिंधे सरकारच्या संगनमताने राज्यात येणारे मोठे प्रकल्प गुजरातला पळविले यांनी त्याकडे गांभीर्याने पाहिले नाही
तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वेचा कार शेड प्रकल्प लातूरला पाठवला यातून पंधरा हजार थेट तर 35000 प्रकल्पासंबंधी रोजगार मिळून 50000 रोजगार प्रकल्पातून मिळणार होते हे कुणाचे पाप ? असा सवाल त्यांनी यावेळी बोलताना केला
तर दुसरीकडे महायुतीचे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे बेरोजगारी कमी करण्यासाठी येथील बेरोजगारांना जर्मनीला पाठवणार असल्याची घोषणा करत आहेत त्यांची ही घोषणा म्हणजे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, चष्म्याचा कारखाना, सेट टॉप बॉक्स वाटप आणि काथ्याचा कारखाना सारखी फसवी आहे जर्मनीला चार लाख नोकऱ्या देणार हे आता निवडणुकीच्या तोंडावर ते सांगत आहेत खोटं चित्र बनवले जात असल्याचाही आरोप त्यांनी यावेळी बोलताना केला
या लोकसभा निवडणुकीमध्ये मोदी सरकार विरोधात देशांमध्ये एक असंतोषाची सूप्त लाट आहे याला कारण बेरोजगारी आणि महागाई आहे तर दुसरीकडे मोदी सरकार रामालाही राजकारणात आणत असल्याचाही आरोप डाॅ परुळेकर यांनी केला.
गेल्या दहा वर्षात वाढलेली अन्नधान्य जीवनावश्यक वस्तूंची महागाई पेट्रोल डिझेलची महागाई बद्दल कोणीच काही बोलत नाही काँग्रेस सरकारच्या काळामध्ये गॅस सिलेंडर 350 रुपयाचा होता त्यावेळेला स्मृती इराणी यांनी डोक्यावर सिलेंडर घेऊन आंदोलन केले होते त्यांना “सिलेंड्रीला” या असे संबोधले जात होते आणि आता हा सिलेंडर बाराशे रुपयावर गेला तरी सरकार कोडगे का ? असा सवालही त्यांनी यावेळी बोलताना केला
मोदी सरकारचे 40 पार हे केवळ संविधान बदलण्यासाठी असून भावनिक आवाहन केले जात आहे या आवाहनाला जनता बळी पडणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी बोलताना दिला
दरम्यान राज्यातील शिक्षण विभागाच्या कारभाराचा त्यांनी पाढाच वाचला ते म्हणाले शिक्षण विभागातील 64 हजार शाळा घशात घालण्याचे काम सध्या सुरू आहे सीएसआरच्या घशात आणि कार्पोरेटच्या ताब्यात या शाळा दिल्या जात असल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली
ईडी, सीबीआय बद्दल बोलताना ते म्हणाले महाराष्ट्रात आत्तापर्यंत 25 जणांना क्लीन चीट देण्यात आली आहे 7हजार कोटींचा घोटाळ्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरोप केल्यानंतर त्यांनाच आपल्या पार्टीमध्ये घेऊन आधी उपमुख्यमंत्री पद आणि नंतर अर्थमंत्रीपद देण्यात आले.किरीट सोमय्या यांनी सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावरही घोटाळ्याचे आरोप केला होता त्याचे पुढे काय झाले असा सवाल त्यांनी यावेळी बोलताना केला