मोदींना समर्थ साथ देण्यासाठी हक्काचा माणूस दिल्लीत पाठवा
भाजपला भरघोस मतदान करून प्रगतीचा आलेख उंचावत ठेवा
महायुतीचे उमेदवार ना. नारायण राणे यांचे आवाहन
बांदा,दि.२८ एप्रिल
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या लगतच असलेल्या गोवा राज्याने पर्यटनाच्या माध्यमातून आपला विकास साधला आहे. त्यांचं राहणीमान, त्यांची श्रीमंती आपल्यापेक्षा जास्त आहे. आंबोलीसारखे हिल स्टेशन व विस्तीर्ण समुद्रकिनारा यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीने निसर्ग संपन्न आहे. प्रगती कडे वाटचाल करणारा हा जिल्हा देखील पर्यटनाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण व्हावा यासाठी माझे प्रयत्न राहणार आहेत. कोकणचा सर्वांगीण विकास हेच माझे ध्येय असून मोदींना समर्थ साथ देण्यासाठी व आपला जिल्हा समृद्ध करण्यासाठी आपला हक्काचा माणूस दिल्लीत पाठवा, असे आवाहन महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले.
बांदा जिल्हा परिषद महायुती कार्यकर्ता मेळावा बांदा येथे संपन्न झाला. यावेळी मार्गदर्शन करताना ना. नारायण राणे बोलत होते. व्यासपीठावर शालेय शिक्षण मंत्री ना. दीपक केसरकर, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, सावंतवाडी माजी नगराध्यक्ष संजू परब, माजी जि.प. सभापती प्रमोद कामत, मनसे जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर, भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, शिवसेना तालुका अध्यक्ष बबन राणे, माजी सभापती शितल राऊळ, बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी, विनायक दळवी, मनसे तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत, वेत्ये सरपंच गुणाजी गावडे, राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्ष रिती परब आदी उपस्थित होते.
ना. राणे म्हणाले, मोदींच्या नेतृत्वात आपला देश आज सुरक्षित आहे. कोणाची या देशाकडे वाकडी नजर करून बघण्याची हिंमत होत नाही. कारण देशाची सुरक्षा व्यवस्था भक्कम करण्याचे काम त्यांनी केले आहे. त्याचप्रमाणे देशातील १४० कोटी जनतेचे जीवनमान उंचावण्याचं काम देखील ते करीत आहेत. हा देश आत्मनिर्भर व्हावा व २०४० पर्यंत आपला देश महासत्ता बनावा यासाठी मोदींचे प्रयत्न सुरू असून तशी घोषणा त्यांनी केली आहे. त्यांच्या या प्रयत्नांना साथ देणे हे आपले कर्तव्य असून तुम्ही ते नक्कीच पार पाडाल, असा विश्वासही व्यक्त केला.
आपल्या जिल्ह्यात पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त आहे. त्यामुळे उद्योग व्यवसायांच्या माध्यमातून महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी नेहमीच आमचे प्रयत्न राहिले आहेत. माझ्या एमएसएमई खात्याच्या माध्यमातून तसेच कॉयर इंडस्ट्रीच्या माध्यमातून येथील महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी भविष्यात आमचे प्रयत्न राहणार आहेत. त्याचप्रमाणे ओरोस येथे मी सुरू करीत असलेल्या ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून देखील फळ प्रक्रिया उद्योग सुरू करून महिलांना आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करेन, अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली.
सिंधुदुर्गातील मते ही माझी हक्काची आहेत. इथून मला ८० ते ९० टक्के मते मिळाली पाहिजेत. कारण मागील ३५ वर्षात या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. १९९० मध्ये मी या जिल्ह्यात आलो तेव्हा गरिब व दरिद्री म्हणून ओळखला जाणारा हा जिल्हा आज आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण बनला. जिल्ह्यातील सर्व पायाभूत सुविधा मी निर्माण केल्या. आता राहिलेला रोजगाराचा मूलभूत प्रश्न सोडवायचा असून त्यासाठी तुमच्या सहकार्याची मला गरज आहे असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
विकास साधायचा असेल तर येथील जनतेने आपली मानसिकता बदलायला हवी. ‘आमका करूचा नाय ‘ हे बदलून ‘ करूक व्हया ‘ ही भूमिका जनतेच्या मनात निर्माण व्हायला हवी. दीपक केसरकर व आमच्यामध्ये काही तात्विक वाद होता. मात्र विकासाच्या मुद्द्यावर आज आम्ही एकत्र आलो आहोत. आम्ही एकत्र आल्यामुळे आता विकासाचा वेग नक्कीच वाढेल. मात्र, तो कायम राखणं तुमच्या हातात आहे. मोदी का हवेत , राणे का हवेत हे येथील जनतेला घराघरात जाऊन सांगा व या निवडणुकीत भाजपला भरघोस मतदान करून प्रगतीचा हा आलेख उंचावत ठेवा, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
दीपक केसरकर म्हणाले, विद्यमान खा. विनायक राऊत यांनी जिल्ह्यात एकही विकासात्मक प्रकल्प आणला नाही. त्यांनी कायम प्रकल्पांना विरोध करण्याचे काम केले. विकासासाठी महायुतीचे उमेदवार ना. नारायण राणे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागा, असे आवाहन केले.
यावेळी युवा कार्यकर्ते निलेश कदम यांनी ना. नारायण राणे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. यावेळी जावेद खतीब, अक्रम खान, बाळू सावंत, साई धारगळकर, सिद्धेश महाजन, मंदार कल्याणकर, गुरुनाथ सावंत, बाबा काणेकर, अंकुश जाधव, अभिलाष देसाई, भैय्या गोवेकर, नीलेश देसाई, दीपक सावंत, दर्पण आळवे, हुसेन मकानदार, रूपाली शिरसाट, राखी कळंगुटकर, देवल येडवे, रेश्मा सावंत, तनुजा वराडकर, श्रिया केसरकर, लक्ष्मी सावंत, माधवी गाड, मकरंद तोरसकर, रत्नाकर आगलावे, आबा धारगळकर, विनेश गवस, कैलास गवस, जयेश सावंत, कास सरपंच प्रवीण पंडित, मधुकर देसाई, नीलेश कदम, संदीप बांदेकर, विकास केरकर, गुरुनाथ सावंत, ज्ञानेश्वर सावंत, बाळा आकेरकर, राकेश केसरकर, सागर सावंत, दादू कविटकर, स्वप्निल सावंत, गजानन गायतोंडे, शुभम साळगावकर, अक्षय परब, शैलेश केसरकर आदींसह महायुतीचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.