रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा संयोजक ,माजी आमदार प्रमोद जठार यांची पत्रकार परिषद
लांजा,दि .२९ एप्रिल
सन २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी सिंधुदुर्ग ची लोकसभा निवडणूक ही हेविवेट लढत असून यासाठी महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी गृहमंत्री अमित शहा यांची ३ मे रोजी रत्नागिरी येथे दुपारी २ वाजता सभा होणार असल्याची माहिती भाजपाचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा संयोजक ,माजी आमदार प्रमोद जठार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
आज लांजा येथील महायुतीच्या कार्यालयात प्रमोद जठार यांनी पत्रकार परिषद घेतली .यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, उद्धव ठाकरे , खासदार राऊत हे दहा वर्षात विकास झाला नाही म्हणून आमच्याकडे बोट दाखवत आहेत .मात्र दहा वर्षात विनायक राऊत हे खासदार होते तेव्हा त्यांनी काय काम केले? मात्र जनता सुजान आहे. राऊत नावाच्या खासदाराने दहा वर्षात आलेले उद्योग पळवले. बेरोजगारी वाढवली ,रस्त्यांची कामे होऊ दिली नाहीत. पर्यटन विकास होऊ दिला नाही आणि म्हणूनच राणेसाहेबांच्या माध्यमातून सगळा बॅकलॉग आपण भरून काढणार आहोत.
महाविकास आघाडीवर टीका करताना त्यांनी सांगितले की, महाविकास आघाडी ही येड्यांची जत्रा आहे .येड्यांची जत्रा तिचे कारभारी सतरा .त्यांचे तीन कारभारी नाहीत तर १७ कारभारी आहेत .खासदार विनायक राऊत प्रचारात पंतप्रधान म्हणून राहुल गांधींना पसंद देतात ,संजय राऊत म्हणतात उद्धव ठाकरे यांना पंतप्रधान करायचे तर तिकडे पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीना पंतप्रधान,उत्तर प्रदेशची जनता अखिलेश यादव यांना तर बिहार मधील लोकांना लालूंना पंतप्रधान व्हावेसे वाटते. काँग्रेसमध्ये देखील पंतप्रधान कोण असावे याबद्दल एकमत नाही. तर तिकडे शरद पवार देखील पंतप्रधान पदावर डोळा ठेवून आहेत. यांचा एक नेता नाही, एक अजेंडा नाही ही सगळी येड्यांची जत्रा आहे.
याउलट महायुतीचा कारभारी एक, विकासाचा अजेंडा एकच. सगळे महायुतीचे घटक पक्ष एकदिलाने काम करत आहेत. २५ कोटी जनतेला गरिबीच्या रेषेबाहेर वर काढणे आणि पुढील पाच वर्षांत देशातून गरिबीचे समुळ उच्चाटन करणे हा पंतप्रधान मोदींचा विकासाचा अजेंडा आहे .आता लोकांना भावनिक आवाहन केले जात आहे. मात्र लोक त्याला बळी पडणार नाहीत. लोकांनी आता ठरवले आहे की आता त्यांना रोजगार हवा आहे, विकास हवा आहे.
सन २०२४ च्या या लोकसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री आणि महायुतीचे उमेदवार नारायण राणे हे अडीच ते तीन लाख मतांनी निवडून येणार आणि संपूर्ण देशाच्या असलेल्या बजेट मधून जास्तीत जास्त निधी हा रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या विकासासाठी मिळेल असा विश्वास प्रमोद जठार यांनी व्यक्त केला. या मतदारसंघातील ही निवडणूक हेवीवेट निवडणूक असल्याने या मतदारसंघात यापूर्वीच उपमुख्यमंत्री फडणवीस यांची सभा झाली होती. तर आता दुसरी सभा ही रत्नागिरी येथे तीन मे रोजी होणार आहे. या सभेसाठी देशाचे गृहमंत्री अमित शहा हे या सभेसाठी उपस्थित राहून जनतेला मार्गदर्शन करणार आहेत आणि यावेळी आपला विजय हा निश्चय असल्याचे यावेळी प्रमोद जठार यांनी ठामपणे सांगितले.
या पत्रकार परिषदेला लोकसभा संयोजक प्रमोद जठार यांच्यासह भाजपाचे लांजा तालुका अध्यक्ष चंद्रकांत मांडवकर ,जिल्हा उपाध्यक्ष महेश खामकर, जिल्हा सरचिटणीस हेमंत शेट्ये ,मुंबईतील पदाधिकारी, त्याचप्रमाणे बाबा लांजेकर आदी उपस्थित होते.