जिल्ह्यातील जमिनी विकून गोरगरीब जनतेला देशोधडीला लावण्याचा धंदा

शिवसेनेत फोडाफोडी करून मुंबई गुजरातला जोडण्याचा भाजपचा प्रयत्न-खासदार विनायक राऊत

सावंतवाडी दि.३० एप्रिल
दिल्ली, हरियाणा वाल्यांना भाजपचे दलाल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जमिनी विकून गोरगरीब जनतेला देशोधडीला लावण्याचा धंदा करत आहेत तसेच शिवसेनेत फोडाफोडी करून मुंबई गुजरातला जोडण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्यामुळेच शिवसेने मध्ये फोडाफोडी करून मराठी माणसाचे प्राबल्यवर घाला घातला आहे. त्याला उत्तर मशाल चिन्हाला मताधिक्याने दिले पाहिजे असे आवाहन इंडिया महाविकास आघाडीचे ठाकरे शिवसेनेचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांनी केले.

इंडिया महाविकास आघाडीचे ठाकरे शिवसेनेचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ कोलगाव येथे आयोजित सभेत उमेदवार विनायक राऊत, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, शेतकरी संघटनेचे नेते वसंत उर्फ अण्णा केसरकर, जिल्हाप्रमुख संजय पडते,काँग्रेस नेते विकास सावंत, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर,शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण महिला अध्यक्षा सौ अर्चना घारे,अँड दिलीप नार्वेकर, आप चे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हाणकर, जिल्हा महिला संघटक जान्हवी सावंत, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, विधानसभा संपर्क प्रमुख शैलेश परब,ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, जिल्हा समन्वयक बाळा गावडे,राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, काँग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, काँग्रेसच्या सौ विभावरी सुकी, चंद्रकांत कासार, मायकल डिसोझा, शब्बीर मणीयार, बाळू माळकर, रुची राऊत आदी उपस्थित होते.
राऊत म्हणाले, दिपक केसरकर आणि नारायण राणे हे एकत्र झाले आहेत पण राणेंच्या कुळाचा उद्धार केसरकर यांनी खुलेपणाने केला होता ते जनता विसरली नाही. मला सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून पस्तीस हजारांचे मताधिक्य जनता देणार आहे. त्यामुळे दीपक केसरकर यांनी अजुनही सावध व्हावे. राणे यांना निवडणुकीत लीड कमी मिळाल्यानंतर यापूर्वी काय काय झालं ते आठवा.मी भक्ती करतो पण लिंबू टिंबू सारखे प्रकार करत नाही असा टोला केसरकर यांना हाणला. इंदिरा गांधी देशाच्या कणखर पंतप्रधान होत्या. विश्वगुरू होण्याचे स्वप्न पाहणाऱ्याकडे तो कणखरपणा नाही.
राऊत म्हणाले,आंबोली, चौकुळ च्या कबुलातदार गावकर जमिनी हडप करण्याचे प्रकार घडले आहेत .माझ्याकडे त्या संदर्भातले पुरावे आहेत. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षांना उध्वस्त करून महाराष्ट्र गुजरातला जोडण्याचा इरादा आहे तो हाणून पाडला पाहिजे.या पुढच्या सर्व निवडणुका इंडिया महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढविण्यात येणार आहेत. माझ्या विरोधात डुप्लिकेट व्यक्ती निवडणुकीत उभी करून विरोधकांनी आपला कर्म दारिद्र्यपणा दाखवला आहे असे राऊत म्हणाले.
यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, शेतकरी संघटनेचे नेते अण्णा केसरकर,काँग्रेस नेते विकास सावंत, अँड दिलीप नार्वेकर, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस कोकण महिला अध्यक्षा सौ अर्चना घारे, स्टार प्रचारक जान्हवी सावंत, बाळा गावडे, मायकल डिसोझा आदी मान्यवरांनी विनायक राऊत यांना विजयी करण्याचे आवाहन केले.