सावंतवाडी दि.१ मे
कोरोना काळात लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली. या लसीकरणामुळे अनेकांना प्राण गमवावे लागले त्यांना सरकार भरपाई देणार का? असा प्रश्न उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिल्हा प्रवक्ता डॉ जयेंद्र परुळेकर यांनी उपस्थित केला आहे.
डॉ जयेंद्र परुळेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे,दोन दिवसांपूर्वी इंग्लंड मध्ये तेथील सर्वोच्च कोर्टाने कोविड वॅक्सीन (कोरोना लस) बनवणाऱ्या ॲस्ट्रा झेनिका (Astra zenica) या बलाढ्य आंतरराष्ट्रीय औषध कंपनीला सदर लस घेतल्यानंतर मृत्यू पावलेल्या ८१ जणांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई देण्यासंदर्भात महत्वाचा निर्णय दिलेला आहे. या निर्णया नंतर त्याचे पडसाद जगभरासह भारतात देखील उमटू लागलेले आहेत.
ते म्हणाले,कोविशिल्ड नावाची लस जी भारतात शेकडो कोटी लोकांना टोचण्यात आली ती भारतात पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या आदार पुनावाला यांच्या मालकीच्या कंपनीने बनवलेली होती ती ॲस्ट्रा झेनिका कंपनीचीच लस होती.ही लस घेतलेल्या अनेकजणांना रक्तात गुठळ्या होण्याचे प्रमाण वाढून हार्ट ॲटॅकचे आणि ब्रेन स्ट्रोकचे प्रमाण वाढलेले दिसून आलेले आहे. अनेकांचे मृत्यू लस घेतल्यानंतर झाले हे निदर्शनास आले आहे.इंग्लंड मधील कोर्टाने दिलेल्या निर्णयानंतर जगभरात कोरोना लसीच्या दुष्परिणामांची आणि त्या मध्ये झालेल्या मोठ्या भ्रष्टाचाराची चर्चा जोरात सुरू आहे.
डॉ परूळेकर म्हणाले,जानेवारी २०२१ पासून कोविशिल्ड लसीकरण सुरू झालं आणि त्या वेळी तत्कालीन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सदर लस सुरक्षित असल्याची ग्वाही देशाला दिली होती. आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी देखील ही लस सेफ असून कोरोना संकटातून देशाला वाचविण्यासाठी प्रत्येकाने घेतली पाहिजे असे आवाहन केले होते. सरकारी,निम सरकारी, एअर पोर्ट, रेल्वे प्रवास,इतर अनेक खासगी आस्थापनांमधील कर्मचारी सगळ्यांना लस घेणे बंधनकारक करण्यात आले होते.
आता हे स्पष्ट झाले आहे की सदर लस सांगितल्याप्रमाणे सुरक्षित नव्हती, लस घेतलेल्या अनेकांना TTS हा रक्तात गुठळ्या होण्याचा आजार होऊन हार्ट ॲटॅकचे प्रमाण आणि ब्रेन स्ट्रोकचे प्रमाण (पक्षाघात/paralysis) मोठ्याप्रमाणात वाढले,अनेकांचे मृत्यू देखील झालै.
दिडशे कोटी लसीचे डोस बनवण्यासाठी मोदी सरकारने पुनावाला यांच्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या कंपनीला हजारो कोटी रुपये दिले होऊ. लस दिल्यानंतर मिळणाऱ्या प्रमाणावर मोदींनी आपला फोटो देखील छापून घेतला. (जगभरात असं कुठल्याही राष्ट्राध्यक्षाने किंवा पंतप्रधानाने केलं नाही)हे हजारो कोटी रुपयांचे कंत्राट मिळावं म्हणून पुनावाला यांनी ५२ कोटी रुपयांचे इलेक्टोरल बाॅण्डस् भारतीय जनता पक्षाला दिले असल्याचे देखील आता उघड झाले आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
डॉ जयेंद्र परुळेकर म्हणाले,”मोदी की गॅरंटी” असा खोटा प्रचार सर्वत्र होत असताना भ्रष्टाचार करून धोकादायक लस सामान्य जनतेला जबरदस्तीने कशी दिली गेली आणि जनतेच्या हजारो कोटी रुपयांचा कसा सौदा करण्यात आला हे आता उघड झाले आहे.लसीकरणा नंतर मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना सरकार आता नुकसान भरपाई देणार का? हा प्रश्न आता जनता विचारत आहे.
मोदींची गॅरंटी ही कशी फसवी आहे हीच चर्चा आज सर्वत्र होत आहे.