कणकवली,दि.२ मे (भगवान लोके)
लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर
सोसायट्या, जिल्हा बँक शाखा शाखांचा वापर राजकीय बैठकांसाठी केला जात आहे .यामध्ये सुरू असलेल्या बैठका आम्ही उधळून लावणार आहोत. त्यावेळी होणारी राजकीय परिस्थिती तसेच कायदा व सुव्यवस्था बिघडली तर त्याला जिल्हा प्रशासन जबाबदार असणार आहे.असा इशारा शिवसेना ठाकरे पक्षाचे कणकवली विधानसभा संपर्क प्रमुख अतुल रावराणे यांनी दिला आहे.
शिवसेना ठाकरे पक्षाचे कणकवली विधानसभा संपर्क प्रमुख अतुल रावराणे यांनी कणकवली येथील शिवसेना कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन राणेंवर टीका केली.
अतुल रावराणे म्हणाले,राणे यांनी आपल्या प्रचारासाठी जिल्हा बँक, सोसायट्या यांचा राजकीय अड्डा म्हणून वापर सुरू केला आहे. तेथे रात्रंदिवस निवडणूूक बैठका होत आहेत. मतदारांना कर्ज मंजूर केले जात आहे. हे प्रकार वेळीच थांबले नाहीत तर जिल्हा बँक कार्यालये, सोसायट्यांमध्ये घुसून आम्ही राजकीय बैठका उधळून लावू .
ते म्हणाले, कुठलीही निवडणूक ही नि:पक्ष व्हायला हवी. पण जिल्हा बँकेच्या सर्व शाखा आणि सोसायट्या यांचा निवडणुकीसाठी वापर होत आहे. या ठिकाणी मतदारांना आणून त्यांना कर्ज मंजूर केले जात आहे. अनेकांना पैसेही वाटप केले जात आहेत. तर जप्तीच्या कारवाईची धमकी दिली जात आहे. या सर्व प्रकारांबाबत आम्ही निवडणूक आयोग आणि जिल्हा प्रशासन यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत. त्याची दखल जिल्हा प्रशासनाने घ्यायला हवी. अन्यथा होणाऱ्या प्रकाराला जिल्हा प्रशासन जबाबदार असणार आहे.
अतुल रावराणे म्हणाले, राणेंकडून ठेकेदार आणि शासकीय अधिकाऱ्यांनाही धमकावले जात आहे. राणेंसाठी काम करा अन्यथा माझ्याशी वैयक्तिक दुष्मनी राहिल असा इशारा राणे देत आहेत. तर टेंडर झाले नसताना अनेक ठेकेदारांना वाडीनिहाय रस्ते डांबरीकरण करण्यास भाग पाडले जात आहे. सर्व नियम धाब्यावर असून रस्त्यांची कामे केली जात आहेत. याविरोधातही आम्ही प्रशासनाकड तक्रारी केल्या आहेत. तसेच सर्व नियमबाह्य कामांचीही आम्ही चौकशी लावणार आहोत.असे अतुल रावराणे यांनी सांगितले.