सावंतवाडी दि.३ मे
साडेसात वर्षे मंत्री आणि १४ वर्ष आमदारकी भोगुनही दिपक केसरकर यांनी सर्वांगीण विकास आणि घोषणेप्रमाणे रोजगार उपलब्ध करून दिला नाही त्यामुळे ते जनतेची दिशाभूल करणारी टिका खासदार विनायक राऊत यांच्यावर करत आहेत त्याला जनताच उत्तर देईल असा विश्वास ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, काँग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शिवसेनेचे अशोक परब, भिमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर जाधव आदी उपस्थित होते.
रूपेश राऊळ म्हणाले, मंत्री, आमदार म्हणून दिपक केसरकर काम करत असताना नारायण राणे यांच्या विरोधात बोंबलत राहिले. दोघांच्या संघर्षामुळे विकास खुंटला.त्यामुळे रेल्वे टर्मिनस असो किंवा सावंतवाडी शहरातील महामार्ग शहराच्या बाहेरून गेले. सावंतवाडी शहरातील व्यापारी, व्यावसायिकांवर संक्रांत आली. केसरकर यांनी स्वतः ची प्राॅपर्टी वाचवण्यासाठी महामार्ग बाहेरून जाण्यास पाठिंबा दिला. सावंतवाडी शहरातील व्यापारी, व्यावसायिक यांच्या धंद्यावर आर्थिक दृष्ट्या संकट आले आहे त्याला केसरकर जबाबदार आहेत.
राऊळ म्हणाले,व्हॅनिटी व्हॅन दिपक केसरकर यांच्या घराजवळ उभीं आहे. केसरकर कुठे जावून झोपले. केसरकर यांनी लोकांची दिशाभूल केली. ते जनतेला फसवत आहेत. साडेसात वर्षे मंत्री पद भोगलेल्या केसरकर यांनी विकास केला नाही रोजगार दिला नाही फक्त बोलबच्चन, भुलथापा भूलभुलैया करत राहीले. आता जनता त्यांच्या आवाहनाला बळी पडणार नाही. जनता धडा शिकविण्यासाठी सज्ज झाली आहे.
राऊळ म्हणाले,चांदा ते बांदा योजनेतून लक्ष्मी ची पाऊले घराघरात उमटतील असे केसरकर सांगायचे उलट दिलेल्या काही शेळ्या रोगट असल्याने मृत्यू पावल्या. बेरोजगार डीएड बीएड तरुणांना वाऱ्यावर सोडले.कबुलायतदार गावकर जमीन, काजू बी हमीभाव फसवणूक केसरकर यांना किंमत मोजावी लागेल.गद्दारांना बाळासाहेब ठाकरे, उध्दव ठाकरे व आदीत्य ठाकरे यांच्यावर टीका करण्याचा अधिकार नाही. त्यांना सर्व काही ठाकरे कुटुंबीयांनी दिले आहे.
पुंडलिक दळवी म्हणाले, नारायण राणे व दिपक केसरकर यांच्या विळा भोपळा जोडीला जनता स्विकारणार नाही. त्यांची दिलजमाई जनतेची दिशाभूल करणारी आहे. केसरकर यांनी फसवेगिरी थांबवली पाहिजे. केसरकर यांच्या थंड दहशतवादाला जनता ओळखून आहे.
भिमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर जाधव म्हणाले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाचे संरक्षण करणे मतदारांच्या हातात आहे. आम्ही भिमशक्ती संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत हंडोरे यांच्या नेतृत्वाखाली लोकसभा निवडणुकीत खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ फिरत आहोत.