उद्धव ठाकरेंची शिवसेना नकली

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा हल्लाबोल ; रत्नागिरीत महायुतीची जाहीर सभा

रत्नागिरी, दि.३ मे

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे खरे वासरदार मनसेचे प्रमुख राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीयमंत्री नारायण राणे हे आहेत. उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही नकली आहे. 370 कलम, राम मंदिर, ट्रिपल तलाकच्या विरोधात असलेल्या काॅंग्रेस व राष्ट्रवादीशी हात मिळवून उद्धव ठाकरे हे स्वार्थसाठी मुख्यमंत्री बनले. मागील 10 वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांची सेवा करून जनतेच्या हिताचे निर्णय घेतले. भारताकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्या देशांना मोदींनी अद्दल घडवली. त्यामुळे मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी महाराष्ट्रातून महायुतीच्या प्रत्येक उमेदवाराला विजयी करून लोकसभेत पाठवावे, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी करतानाच त्यांनी काँग्रेस व राहुल गांधींवर हल्लाबोल केला.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ रत्नागिरी येथे आयोजित केलेल्या महायुतीच्या सभेत श्री. शहा बोलत होते. यावेळी नारायण राणे, उद्योगमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावळकुळे, भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, आमदार कालिदास कोळंबकर, आमदार शेखर निकम, आमदार नीतेश राणे, माजी आमदार राजन तेली, माजी आमदार प्रमोद जठार यांच्यासह महायुतीचे नेते, पदाधिकारी उपस्थित होते.
शहा म्हणाले, इंडिया आघाडीतील पक्ष भारत देश विकसित करू शकता का असा सवाल शहा यांनी केला. अस्थिर सरकारांमुळे देशाने खूप भोगले आहे. 12 लाख कोटींचा घोटळा करणारे इंडिया आघाडीतील पक्ष देश चालवू शकत नाही. महाराष्ट्राच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद मोदी कटिबद्ध आहे. शरद पवार केंद्रात मंत्री असताना त्यांनी महाराष्ट्रासाठी काही दिले नाही, तर नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र खूप काही दिले आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकास करण्याची क्षमता भाजप व नारायण राणे यांच्यात आहे. युपीएचे सरकार असताना पाकिस्तानमधून आंतकवादी व दशहतवादी देशात घुसून बॉम्बस्फोट करत होते. मात्र, देशात नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतर आंतकवादी व दशहतवाद्यांची नाकेबंदी केली. परिणामी देशात कुठेही बॉम्बस्फोट झाले नाहीत. कश्मीरमधील 370 हटविण्याचे धाडस मोदी सरकारने केले. काँग्रेस व राष्ट्रवादी हे पक्ष 370 कलम हटविण्याच्या विरोधात होते. त्याच पक्षांची साथ उद्धव ठाकरे यांनी धरली आहे.
कोकण रेल्वेची विद्युतीकरण व सिंधुदुर्गात विमानतळ सुरु करण्याचे काम मोदी यांनी केले. कोकणवासीयांसाठी वंदे भारत रेल्वे मोदींनी सुरु केली. काजूचे उत्पादन घेणाऱ्यांसाठी काजू बोर्ड सुरु करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेऊन त्यांचे भले केले. आंबा उत्पादकांसाठी आंबा बोर्ड सुरु करण्याचे काम मोदी सरकारने केले. रत्नागिरी व सिंधुदुर्गातील 12,000 पेक्षा जास्त गरीबांना मोदींनी घरे बांधून दिली. देश विकसित बनविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्याचे काम देशवासीयांनी केले पाहिजे. थोडीशी गरमी वाढल्यानंतर परदेशात जाणारे राहुल गांधी भारत देश चालवू शकत नाहीत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांना प्रचंड मतांनी विजय करून आपल्या हक्काचा खासदार लोकसभेत पाठवावा, असे आवाहन त्यांनी कोकणी जनतेला केला. मोदी सरकारच्या 10 वर्षांतील कामगिरीचा लेखाजोखा शहांनी मांडला. काॅंग्रेस, राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल करीत यांच्या हाती देशाची सत्ता देऊ नका, असे आवाहन त्यांनी केले. सभेच्या शेवटी शहा यांनी जय श्री राम, वदे मातरम् चा नारा दिला.