सावंतवाडी,दि.५ मे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला ज्यांनी फसवण्याचं विश्वासघात बेईमानी करण्याचं काम केलं तेच राणे आणि केसरकर स्वतःचा जनाधार संपल्याने आज एकत्र आले आहेत. दो बेचारे बिना सहारे अशी दोघांची अवस्था झाली आहे अशी टीका ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी केली.
तर माझ्या राजकीय वाटचालीत काँग्रेस विचारांनी प्रेरित होऊन मी राणेंसोबत गेलो होतो ही माझी मोठी चूक होती, आज ती चूक मंत्री दीपक केसरकर करत असून त्यांची राजकीय वाटचाल अधोगतीकडे चालली असल्याचेही श्री पारकर म्हणाले.
श्री पारकर यांनी आज येथे पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांच्यासोबत आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर, ठाकरे सेनेचे सावंतवाडी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, काँग्रेसचे समीर वंजारी, शहरप्रमुख शैलेश गवंडळकर आदी उपस्थित होते.
श्री पारकर म्हणाले, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचा विचार करता अनेक प्रश्न या ठिकाणी प्रलंबित आहेत.अविकसित असलेले रेडी पोर्ट, बंद असलेला उत्तम स्टील प्रकल्प तर येथील शेतकऱ्यांच्या वनसंज्ञेचा प्रश्न, शालेय शिक्षण मंत्री असतानाही डीएड बीएड बेरोजगारांची प्रश्न तर पटसंख्या अभावी बंद पडत असलेल्या शाळांचा मुद्दा असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत मुळात त्या ठिकाणी पंधरा वर्षे आमदार मंत्री पद भूषविणाऱ्या केसरकारांनी आणि ३५ वर्ष सत्ता भोगणाऱ्या राणे यांनी जनतेला फसवण्याचेच काम केलं आहे. त्यामुळे आज जनता त्यांना कंटाळलेले आहे.
ते पुढे म्हणाले, राणे आणि केसरकर यांची जी अभद्र दिलजमाई झाली आहे ती युती केवळ त्यांच्या पाठीशी असलेला जनाधार संपल्याने झाली आहे, आमदार मंत्री झाले परंतु इथल्या मतदारसंघाचा विकास करू शकले नाही दुसरीकडे नारायण राणे केंद्रीय मंत्री असतानाही या ठिकाणी रोजगार आणू शकले नाही आज निसर्गाला घातक असलेला मायनिंग प्रकल्पांना या दोघांचा पाठिंबा आहे जिल्ह्याचा विकास नको तर स्वतःचा आर्थिक फायदा पाहण्यात हे धन्यता मानत आहेत मात्र आमच्याकडे सत्ता असो किंवा नसो जनतेच्या आम्ही नेहमी भक्कमपणे पाठीशी राहणार आहोत. दीपक केसरकर हे याच राणेंच्या विरोधात दहशतवादाचा मुद्दा घेऊन बोलत होते मात्र तेच आत त्यांच्या मांडीला मांडी लावून बसत आहेत त्यामुळे केसरकर यांच्या बदललेल्या भुमीकेच्या विरोधात जनता आहे हा विरोध ते निश्चितच मत पेटीतून दाखवून देणार आहेत.
पारकर म्हणाले, कोकण रेल्वे प्रवासी नाराजी आहे. प्रवाशांची गैरसोय होते. आरक्षण मिळत नाही. प्लॅटफॉर्मवर उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागतो आहे. त्याकडे दुर्लक्ष करून सुशोभीकरणाच्या नावाखाली ठेकेदारी केली आहे. कोकण रेल्वे भारतीय रेल्वे बोर्डात विलीनीकरण झाली पाहिजे पण त्याकडे साफ दुर्लक्ष केला जातो. सुमारे ५८ रेल्वे गाड्या या मार्गावर धावतात पण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रवाशांची गैरसोयीचा विसर केंद्र सरकारला पडला आहे.