सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर यांनी मानले आभार
कणकवली दि.१० मे(भगवान लोके)
आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने अंतिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. अरविंद केजरीवाल यांना मिळालेला जामीन म्हणजे लोकशाहीचा विजय आहे अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर यांनी स्वागत केले आहे. तसेच त्यांनी पक्षाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयाचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
अरविंद केजरीवाल यांना १ जूनपर्यंत जामीन मंजूर झाला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्ष आणि इंडिया आघाडीला मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्ली मद्य धोरण घोटाळाप्रकरणी अरविंद केजरीवाल यांना ईडीने २१ मार्चला अटक केली होती. मागील ५० दिवसांपासून ते तुरुंगात आहेत. सध्या सुरु असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी केजरीवाल यांना हा अंतरिम जामीन सुप्रिम कोर्टाने मंजूर केला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर बोलताना आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर म्हणाले, न्यायालयाचा निर्णय हा एक संकेत आहे की देशातील लोकशाही धोक्यात आहे. लोकसभा निवडणुकीत आपला सपशेल पराभव दिसतात ईडी सारख्या यंत्रणांचा वापर करून भाजपच्या मोदी सरकारने अरविंद केजरीवाल यांना जेलमध्ये डांबण्याचा प्रयत्न केला. एका खोट्या प्रकरणांत PMLA सारखे गंभीर गुन्हे लावून देखील अवघ्या ५० दिवसांत अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मिळणे ही बाब सत्याची बाजू दर्शवते. आता निवडणुकीच्या रणांगणात केजरीवाल यांच्या परिवर्तनवादी विचाराची तोफ निश्चितपणे धडाडील आणि या देशात भाजपच्या मोदी शहांच्या हुकूमशाहीला लगाम बसेल असे सांगतानाच सत्यमेव जयते! म्हणत देशात इंडिया आघाडीचा विजय होणार आणि हुकूमशाहीचा पराभव होणार! असे देखील विवेक ताम्हणकर यावेळी म्हणाले आहेत.