मालवण,दि.२७ जानेवारी
केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केल्यानंतर जिल्ह्यात आमूलाग्र बदल झाला आहे. आमचा जिल्हा सर्वच बाबतीत चांगला आहे. जिल्ह्यातील प्रत्येक व्यवस्थेबद्दल सकारात्मक विचार ठेवा. व्होकल फॉर लोकलचा प्रचार आपणच करायचा आहे. जिल्ह्यात पर्यटनाच्या माध्यमातून मोठा बदल शक्य आहे. आगामी काळात लोकसभेच्या महाविजयासाठी आपण आई भराडी देवीच्या चरणी नरेंद्र मोदी पुन्हा देशाचे पंतप्रधान व्हावेत असे साकडे घातल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आंगणेवाडी येथे केले.
आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची स्वच्छतागृहा अभावी गैरसोय होत असल्याने सुमारे २ कोटी निधी खर्च करून उभारण्यात आलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाचे लोकार्पण पालकमंत्री श्री. चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी भाजप नेते निलेश राणे, जिल्हाधिकारी किशोर तावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा पोलीस प्रमुख सौरभ कुमार अग्रवाल, सेवानिवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, आंगणे कुटुंबिय अध्यक्ष भास्कर आंगणे, सरपंच मानसी पालव, उपरपंच समीक्षा आंगणे, भाजप नेते राजन तेली, तहसीलदार वर्षा झालटे, नायब तहसीलदार श्रद्धा चौगुले, गटविकास अधिकारी आत्मज मोरे, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, अशोक सावंत, संदीप परब, ठेकेदार संतोष कदम आदी उपस्थित होते.
श्री. चव्हाण म्हणाले, देशात आणि राज्यात हिंदूमय वातावरण निर्माण झाले आहे. संस्कृती जपण्यासाठी सरकारचे पाठबळ मिळत आहे. वेगवेगळे विकास प्रकल्प जिल्ह्यात येत आहेत. नौदल दिनानंतर राजकोट किल्ला पाहण्यासाठी लाखो पर्यटक येत आहेत. यातून व्यापार सुद्धा वाढत आहे. सिंधुदुर्ग मधील सर्व किल्ल्यांचे संवर्धन होण्यासाठी भाजपची टीम काम करत आहे. भगवंतगड, रामगड, नांदोस या किल्ल्यावर जमीन मालकांनी जागा देण्याची संमती दिली आहे. बजेट मध्ये या किल्ल्याना आदर्श पद्धतीने संवर्धन करण्यासाठी निधी देण्यात येणार आहे. मोरयाचा धोंडा हे देवस्थान सुद्धा विकसित होत आहे. मोदी है तो मुमकीन है! या वाक्याची प्रचिती देश वासीय घेत आहेत. राम मंदिर सारखा पाचशे वर्षे प्रलंबित प्रश्न मोदीनी सोडवला आहे. आंगणेवाडी साठी यापुढेही निधीची कोणतीही कमतरता भासणार नाही हा आपला शब्द आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग मधील सर्व रेल्वे स्टेशन सुशोभीत करण्यात येत आहेत. विमानतळावर आल्यासारखे वाटावं असे काम करण्यात येणार आहे. सकारात्मक विचार ठेवा असेही श्री. चव्हाण म्हणाले.
मागील काही वर्षे जिल्ह्यात बराच निधी आखर्चित रहायचा. अधिकाऱ्यांशी चर्चा करून याबद्दल मी माहिती घेतली. एखादा अधिकारी चुकीचे काम करत असेल तर कायद्याने करायचे काम मी करणार व केले सुद्धा आहे. अशा अधिकाऱ्यांना जिल्ह्याबाहेर जावे लागेल असे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगत कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड, इंजिनिअर संतोष कदम यांचे कौतुक करत अभिनंदन केले. तसेच पत्रकारांचे सुद्धा नौदल दिन कार्यक्रमात चांगले सहकार्य लाभल्याचे सांगितले.
यावेळी श्री राणे यांनी आई भराडी वरील श्रद्धेमुळे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचे आंगणेवाडीवर आहे. आंगणेवाडी मधील कामे गतवर्षी जलद गतीने झाली. कामाची धमक रवींद्र चव्हाण यांच्यात आहे. येथील अनेक वर्षांच्या प्रलंबित मागण्या चव्हाण यांनी पूर्ण केल्या आहेत. आंगणेवाडी मध्ये उभारलेले स्वच्छतागृह पूर्ण राज्यात नसेल. चव्हाण पालकमंत्री झाल्यानंतर या भागाचा विकास मोठ्या प्रमाणावर झाला. या भागातील मागण्या पूर्ण होण्यासाठी पालकमंत्री कृतीमधून काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.
मंडळाचे अध्यक्ष भास्कर आंगणे यांनी पालकमंत्र्यांचे आभार मानताना मागील सात वर्षे केवळ आश्वासन मिळालेली कामे पालकमंत्र्यांनी पूर्ण केल्याचे सांगितले.
यावेळी आंगणे कुटुंबियांच्या वतीने पालकमंत्री रवींद्र चव्हाण व भाजप नेते निलेश राणे यांच्या विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी माळगाव सरपंच सौ. साळसकर, राजेंद्र प्रभुदेसाई, महेश बागवे, सरोज परब, छोटू ठाकूर, दया प्रभुदेसाई, निलेश खोत, ग्रामसेवक युगल प्रभुगावकर, राजन गावकर, बाबू परब यांच्यासह अन्य आंगणे बंधू उपस्थित होते. सुत्रसंचलन बाबू आंगणे यांनी केले. मधुकर आंगणे यांनी आभार मानले.