पाण्यात उभे राहून अनोखे आंदोलन

वेंगुर्ला,दि .२८ जानेवारी

शिरोडा-वेळागर येथील अल्पभूधारक गरीब शेतक-यांवर १९९० सालापासून सरकारकडून झालेल्या अन्यायाविरुद्ध व ताज प्रकल्प संपादित क्षेत्रातून नऊ हेक्टर क्षेत्र वगळण्यासाठी शिरोडा-वेळागर शेतकरी संघटनेच्यावतीने शेकडो भूमिपुत्र शेतक-यांनी २६ जानेवारी रोजी वेळागर येथील खाजण खाडीपात्रातील महिलांनी पाण्यात आपल्या कुटुंबासमवेत उभे राहून आंदोलन छेडले. तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ३५ ते ४० कुटुंबातील पुरुष सदस्यांनी आंदोलन छेडले. एकाच वेळी दोन ठिकाणी आगळे वेगळे लाक्षणिक उपोषण छेडले.

गेली तीस वर्ष वेळागरवासिय आपल्या न्यायहक्कासाठी लढा लढत आहेत. त्यांची घरे व शेती बाग बागायती यातूनच ३० ते ३५ कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. मात्र आज त्यांच्या सातबारामध्ये एमटीडीसी अशी शासनाची नोंद झाली आहे. ती नोंद रद्द करून पूर्ववत शेतकरी, बागायतदार भूमिपुत्रांच्या नावाची नोंद करून द्यावी व शेतक-यांना भूमीहिन होण्यापासून वाचवावे या मागणीसाठी व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी २६ जानेवारी रोजी एक दिवसीय लाक्षधिक उपोषण व आंदोलन छेडले. विशेष म्हणजे या आंदोलनात लहान मुलांनी सहभाग दर्शविला. यावेळी उपस्थित उर्मिला आंदुर्लेकर, राजश्री आंदुर्लेकर, भाग्यश्री गवंडी, महिमा नाईक, कुमुदिनी गवंडी, शितल आरोसकर, वनिता आरोसकर, शारदा आरोसकर, संध्या रेडकर, रूपाली आरोसकर, प्रगती आरोसकर, दीपा आमरे, रश्मी डिचोलकर, शर्वाणी नाईक यांसह अन्य महिला त्याचबरोबर विनोद आरोसकर, वामन गवंडी, संजय आंदुर्लेकर, महेश आंदुर्लेकर, प्रदीप आरोसकर, जगन्नाथ आंदुर्लेकर यासह वेळागरवाडी येथील ३५ ते ४० कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते.