कुडाळ,दि. १६ डिसेंबर
महायुतीच्या राज्य सरकारचा मंत्रिमंडळ शपथग्रहण सोहळा रविवारी नागपूर येथे पार पडला. या शपथग्रहण सोहळ्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र तथा विद्यमान आमदार नितेश राणे यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर सिंधुदुर्गात सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी नागपूर येथे आमदार नितेश राणे यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.
यानंतर जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत पत्रकार परिषदेत म्हणाले की, कणकवली विधानसभेचे तिसऱ्या टर्मचे आमदार आणि संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या प्रखर हिंदुत्ववादी भूमिकेने परिचित असलेले भारतीय जनता पार्टीचे युवानेते नितेश राणे यांचा कॅबिनेट मंत्री म्हणून या राज्य मंत्रिमंडळात समावेश होताना बघून मनस्वी आनंद झाला. नितेश राणे यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर राज्यातील सर्व हिंदुत्ववादी संघटना आणि जिल्ह्यातीलच नव्हे तर कोकणातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये एक नवचैतन्य आणि उत्साह पाहायला मिळाला.
गेल्या सरकारमध्ये मार्गदर्शक रविंद्र चव्हाण यांनी पालकमंत्री म्हणून जिल्ह्यात फार मोठे काम उभे केलेले आहे. त्याचबरोबर कोकणातील भाजपा संघटनेकडे विशेष लक्ष देवून सर्व निवडणुकात विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावलेली होती. त्यांचाच वारसा आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून जिल्ह्यात सुरू राहील. तसेच खासदार नारायण राणे आणि रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात शतप्रतिशत भाजपाचे मिशन पूर्णत्वास जाईल असा विश्वास जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी व्यक्त केला.
आमदार नितेश राणे यांनी दहा वर्षे कणकवली विधानसभेचे प्रतिनिधित्व करतानाच राज्यभर हिंदुत्व विषयातील कामाकडे विशेष लक्ष दिले. खरेतर ते हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. अश्याच वेगाने त्यांचा संघटना आणि जिल्ह्याचा विकास या मार्गाने प्रवास सुरू राहील. ते राज्यातील एक प्रमुख नेते म्हणून कीर्ती मिळवतील अशा शुभेच्छा प्रभाकर सावंत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिल्या.
भाजप नेते रविंद्र चव्हाण हे संघटना शरण कार्यकर्ते आहेत. आजपर्यंत पक्ष जो आदेश देईल तो शिरसावंद्य मानून यांच्यावर पक्षाने त्या-त्या वेळी सोपवलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडलेली आहे. कोकणातील संघटनेला जीवदान देवून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्यांनी उतुंग असे यश पक्षाला मिळवून दिलेले आहे. आता पक्षाने त्यांच्यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देणे निश्चित केलेले आहे. त्या जबाबदारीला सुद्धा ते एका वेगळ्या उंचीवर नेतील आणि राज्यातील शतप्रतीशत भाजपचे स्वप्न साकार करतील असा आशावाद प्रभाकर सावंत यांनी व्यक्त केला.
जिल्हाध्यक्ष या नात्याने खासदार नारायण राणे, रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नामदार नितेश राणे यांच्या साथीने जिल्ह्यात आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकीत फार मोठे यश मिळवून विजयाची परंपरा अशीच अखंडित ठेवण्यासाठी माझ्या सर्व सहकाऱ्यांसमावेत अहोरात्र मेहनत करून जिल्ह्याला मिळालेले हे मंत्रिपद सत्कारणी लावू अश्या भावना प्रभाकर सावंत यांनी व्यक्त केल्या.