सावंतवाडी,दि.१९ डिसेंबर
सावंतवाडी उप जिल्हा कारागृह सुरक्षेच्या दृष्टीने मजबूतीवर भर दिला जात आहे. यासाठी ३५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून सार्वजनिक बांधकाम विभाग भिंत एक मिटरने वाढवत आहे तर सोलर फेन्सिंग देखील करत आहे.
आंबोली-नांगरतास चेकमेट बॉम्बस्फोट प्रकरणातील संशयित ज्ञानेश्वर उर्फ माऊली लोकरे हा फरार झाल्यानंतर चर्चेत आलेल्या सावंतवाडीच्या संस्थानकालीन कारागृहाची सुरक्षा आता पुन्हा एकदा वाढविण्यात येत आहे. त्यासाठी कारागृहाची भिंत एक मीटरने उंच उभारण्यात येणार आहे तसेच त्या ठिकाणी सोलर फेन्सिंग सुद्धा उभारले जाणार आहे. यासाठी जिल्हा नियोजनच्या निधीमधून तब्बल ३५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
सध्या युध्दपातळीवर हे काम सुरू आहे. त्यामुळे याचा फायदा कारागृहाची सुरक्षा वाढण्यासाठी होणार आहे. पैशाची वाहतूक करणारे चेकमेट गाडी उडवून देण्याचा उद्देशाने संबंधित संशयित लोकरे व त्यांच्या अन्य सहा साथीदारांनी नांगरतास येथे रस्त्यावर ट्रक उभा करून त्याच्या खाली चेकमेट ही पैसे वाहतूक करणारी गाडी उडून देण्यासाठी बॉम्ब पेरला होता. परंतु तत्पूर्वीच त्याठिकाणी उभा असलेला ट्रक पाहण्यासाठी काही स्थानिक करून गेले होते. त्याचवेळी हा बॉम्बस्फोट झाला होता. त्यात तीघे जण गंभीर जखमी झाले होते तर उपचारादरम्यान दोन युवकांचे निधन झाले होते. ही घटना ११ सप्टेंबर २००७ ला घडली होती. संजय गावडे आणि दत्तात्रय गावडे अशी मृत झालेल्या तरुणांची नावे होती. त्याप्रकरणी लोकरे याच्यासह सहा जणांवर येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान शिक्षा भोगत असताना लोकरे याने सावंतवाडी कारागृहाची उंच भिंत पाईपच्या सहाय्याने ओलांडून पळ काढला होता. त्यामुळे हे कारागृह चर्चेत झाले होते. त्यानंतर कारागृहाच्या सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण झाला होता. त्यानंतर त्या ठिकाणी तात्पुरते सोलर फेंसिंग उभारून या प्रश्नावर पडदा टाकण्यात आला होता तर दुसरीकडे तत्कालीन गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आता या जेलचा वापर जेल टुरिझमसाठी केला जाईल, असे जाहीर केले होते. परंतु प्रत्यक्षात त्या पर्यटन प्रकल्पाला अद्याप पर्यंत मंजुरी मिळाली नाही.
मात्र सद्यस्थितीत त्या ठिकाणी ४० ते ५० जण बंदीवान शिक्षा भोगत आहे. तर अन्य २० हून अधिक जण न्यायालयीन कोठडी मिळाल्याने त्या ठिकाणी आणले जातात. त्यामुळे या सगळ्या बंदीवानांची सुरक्षा लक्षात घेता तसेच त्यांच्याकडून पुन्हा पळून जाण्याचा कोणताही प्रयत्न होवू नये यासाठी जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून या कारागृहाच्या सुरक्षेसाठी ३५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. तो आता खर्च करण्यात येत आहे. या निधीच्या माध्यमातून कारागृहाच्या बाजूला असलेल्या भिंती एक मीटरने उंच करण्यात येणार आहे तर अन्य ठिकाणी काही मजबुती करण्याची कामे केली जाणार आहे.