गेले नऊ दिवस सूरु असलेले धरणे आंदोलन पाण्याचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत चालु  ठेवण्याचा निर्धार

वैभववाडी, दि.१३ फेब्रुवारी
हेत किंजळीचा माळ पुनर्वसन गावठाणातील विहीर चोरीस गेल्याची तक्रार धरणग्रस्तांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. गेले आठ दिवस धरणे आंदोलन सुरु असून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे धरणग्रस्तांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन येत्या दहा दिवसात विहीरीबाबत ठोस निर्णय झाला नाही. तर आमरण उपोषण करण्याचा इशारा हेत किंजळीचा माळ पुनर्वसन गावठाणातील धरणग्रस्तांनी दिला आहे. तर गेले नऊ दिवस सूरु असलेले धरणे आंदोलन पाण्याचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत चालु  ठेवण्याचा निर्धार केला आहे.
अरुणा धरणातील विस्थापित १६५ कुटुंबाचे सन २०१९ साली हेत किंजळीचा माळ येथे पुनर्वसन केले आहे. या पुनर्वसन  गावठाणासाठी हेत बांबर येथे पाटबंधारे विभागाने बांधलेल्या विहीरीवरुन पुनर्वसन गावठाणात नळयोजनेद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला आहे. परंतु ही विहीर नेमकी कोणाची आहे. हे आम्हांला माहीत नाही. कागदोपञी पुनर्वसन गावठाणासाठी विहीर आहे. असे भासविण्यात आले आहे.परंतु पुनर्वसन गावठाणात विहीरच नसल्यामुळे आमचे पाण्याविना हाल होत आहेत. पाटबंधारे विभागाकडून आम्हांला आमच्यासाठी असलेली विहीर दाखवावी. नाहीतर नवीन विहीर तयार करुन दयावी. या मागणीसाठी सोमवार दिनांक ५ फेब्रुवारी पासून धरणग्रस्तांचे आंदोलन सुरु असून धरणाच्या कालव्याचे काम बंद पाडले आहे. माञ संबंधितांकडून कोणतेही ठोस आश्वासन देण्यात येत नाही. त्यामुळे येत्या दहा दिवसात विहीरीबाबत ठोस कार्यवाही झाली नाही तर आमरण उपोषणाचा इशारा धरणग्रस्तांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांना दिला आहे.
नवव्या दिवशीही प्रकल्पस्थळी वयोवृध्दांसह माजी सरपंच सुरेश नागप, शिवाजी पडीलकर, सुनिल नागप, विजय नागप, महादेव नागप, धोंडू नागप, सदाशिव नागप, विनोद नागप, परशुराम पडीलकर, मानजी घाग, दत्ताराम कदम, ज्ञानेश्वर नागप, गोपाळ सुतार, हिरालाल गुरव, अंकुश कदम आदी धरणग्रस्त उपस्थित होते.