आम्ही परशुराम उपरकर यांच्या उपस्थितीत १८ फेब्रुवारीला निर्धार मेळावा घेणार..

आमच्या मनातील चीड व्यक्त केली जाईल ; लोकसभेपूर्वी आगामी निर्णय घेतला जाईल…

कणकवली दि.१५ फेब्रुवारी(भगवान लोके)

नव वर्षाच्या सुरुवातीलाच मनसे आजी – माजी पदाधिकाऱ्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला.सदरचा निर्णय घेत असताना राज ठाकरे यांच्यावरील प्रेम आणि निष्ठा तेव्हाही कायम होती आणि आताही कायम आहे.परंतु पक्षात जमलेल्या काही बांडगुळानी पक्ष संघटना प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बनवली आहे.त्यामुळे आम्ही माजी आ.परशुराम उपरकर यांच्या उपस्थितीत १८ फेब्रुवारीला सकाळी ११ वा.’निर्धार मेळावा’ कुडाळ येथे घेत आहोत.आमच्या मनातील चीड व्यक्त केली जाईल.लोकसभेपूर्वी आगामी निर्णय घेतला जाईल,अशी माहिती प्रसाद गावडे व अन्य कार्यकर्त्यांनी दिली.

कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी आशिष सुभेदार,विनोद संडव,आबा चिपकर,आप्पा मांजरेकर,राकेश टकसाळी,मंदार नाईक, बाबल गावडे,प्रकाश साटेलकर,दीपक गावडे,नाना सावंत,बाळा बहिरे,बाळकृष्ण ठाकूर, गणेश गावडे आदींसह मनसे माजी पदाधिकारी उपस्थित होते.

आमचा हा मेळावा कार्यकर्त्यांचा स्वाभिमान जपणारा आणि निष्ठेला बळ देणारा आणि परशुराम उपरकर यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा असणार आहे.मात्र,आगामी काळात नेमक्या कोणती दिशा ठरवणार आहोत हे त्या मेळावा झाल्यानंतर एकत्र बसून प्राप्त राजकीय परिस्थितीचा विचार करता व लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी निर्णय घेणार आहोत. मनसेत सैनिकांना बाजूला करत स्वतः च्या मर्जीतले अकराम गयाराम लोक नेमण्याचे कार्य सुरू केले.त्यामुळे पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय आम्ही घेतला होता.मात्र पुढची दिशा कोणती घेणार? याबाबत कुठलाही निर्णय आम्ही घेतला नव्हता.जिल्ह्यातील जवळपास ८० टक्के मनसे पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याने या सर्व पदाधिकाऱ्यांची मते आणि विचार जाणून घेण्यासाठी रविवार १८ फेब्रुवारी २०२४ रोजी कुडाळ ओंकार डिलक्स येथील सभागृहात निर्धार मेळावा सकाळी ११ वाजता आयोजित केला आहे .

या मेळाव्यासाठी आमच्या सोबत जिल्ह्यातील गावागावांमध्ये काम करणारे ग्रामस्थरीय पदाधिकारी हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत.मेळाव्याला माजी आमदार परशुराम उपरकर याना देखील निमंत्रित करून आमच्या भावना जाहीर व्यासपीठावर व्यक्त करणार आहोत,असे प्रसाद गावडे यांनी सांगितले.