पेहलगाम आतंकवादी हल्ल्यात मृत्यूमूखी पडलेल्यांना आम्ही कणकवलीकर यांनी वाहिली श्रद्धांजली

पेहलगाम हत्याकांड हे माणुसकी हरवल्याचे चित्र – अशोक करंबेळकर; “मी भारताचा आणि भारत माझा” अशी राष्ट्रीय एकात्मतेची भावना आवश्यक

कणकवली दि.२६ एप्रिल

पहेलगाम हत्त्याकांड हे माणुसकी हरवत चाललेल्या आधुनिक जगाचा हिडीस चेहरा आहे. एकेकाळचा साम्राज्यवाद आता क्रूरतेची परिसीमा गाठलेल्या धार्मिक दहशतवादात परिवर्तित होत आहे. आपण सर्वसामान्य भारतीय नागरिक “मला काय त्याचे” अशा षंढ विचाराने कोणतीच प्रतिक्रिया देत नाही, हे तर फारच गंभीर आहे. आपल्या चेतना, संवेदना जागृत असतील तर पहेलगाम हत्त्याकांड परिस्थितीचा, प्रवृत्तीचा निषेध केला पाहिजे , असे मत ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर यांनी व्यक्त केले.
कणकवली येथील “आम्ही कणकवलीकर’ यांनी आयोजित श्रद्धांजली सभेत केले. आज मी, माझा (राजकीय) पक्ष, माझा नेता आणि माझ्या पक्षाची मतप्रणाली यामध्येच भारतीय नागरिक विभागला गेला आहे. “मी भारताचा आणि भारत माझा” अशी राष्ट्रीय एकात्मतेची भावना कुठेही दिसून येत नाही. समूह नायकही त्या दृष्टीने राजकारण, समाजकारण करताना आढळत नाहीत. देश घडविणारी किंवा बिघडविणारी तरूणाई आभासी जगातच जगत असल्याने, या तरुण पिढीला पुढील वर्षभरात “मी भारताचा आणि भारत माझा” अशी राष्ट्रीय एकात्मतेची भावना ईथे जमलेल्या प्रत्येक सजग जाणकार संवेदनशील नागरिकांनी करून दिली तर, पहेलगाम हत्त्याकांडात नाहक मृत्यूमुखी पडलेल्या भारतीयाना खरीखुरी श्रद्धांजली ठरेल.

याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघाचे जिल्हाध्यक्ष भालचंद्र मराठे, सेवानिवृत्त संघटनेचे सीताराम कुडतरकर, पत्रकार विजय गांवकर , कणकवली महाविद्यालयाचे प्रा. हरिभाऊ भिसे यांनी आपले विचार व्यक्त केले. अखेरीस विनायक मेस्त्री यांनी आढावा घेऊन मृतात्म्याना श्रद्धांजली वाहण्यात आली.
या शोकसभेसाठी सौ.सुप्रिया पाटील, पत्रकार संतोष राऊळ ,रमेश जोगळे, निवृत्त पोलिस निरीक्षक अर्जुन राणे, निवृत्त पोलिस उपनिरीक्षक चव्हाण, हनीफ पीरखान, मनोहर पालयेकर, संजय पाध्ये, कृष्णा दळवी, सखाराम सपकाळ , प्रसाद घाणेकर , डॉ. करंबेळकर, श्री.पटेल , ज्ञानेश पाताडे प्रा.सचिन वंजारी आदी संवेदनशील नागरिक उपस्थित होते.