वेंगुर्ला,दि.२६ ऑक्टोंबर (प्रथमेश गुरव)
गेले काही दिवस सुरू असलेल्या अवकाळी पावसाने शेतक-यांच्या तोंडचे पाणी पळविले आहे. तर दुसरीकडे पर्यटन हंगामही तोट्यात गेला असून पर्यटकांच्या गर्दीने गजबजणा-या किना-यांवर पर्यटकांची संख्या घटली आहे. त्यातच चक्रीवादळाचा इशारा दिल्याने मच्छिमारांनी आपल्या होड्या किना-यावर आणल्या आहेत.
सध्याचा हंगाम हा पर्यटनाचा हंगाम आहे. दिवाळीच्या सुट्टीत बरेचजण आपल्या कुटुंबासहीत पर्यटनाला बाहेर पडतात. परंतु, यावर्षी अवकाळी पावसाने शेतक-यांसोबत पर्यटन व्यावसायीकांनाही त्रस्त करून सोडले आहे. पावसाळी हंगामासारखा पाऊस सक्रीय झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी दिसू लागले आहे. त्यात चक्रीवादळाचीही इशारा दिला आहे. त्यामुळे मच्छिमारांनी आपल्या होड्या सुरक्षित किना-यावर आणल्या आहेत. परिणामी मासेमारीही ठप्प झाली आहे. पर्यटनांचा आनंद लुटण्यासाठी बरेच पर्यटक समुद्र किनारी येत असतात. परंतु, अवकाळी पाऊस आणि चक्रीवादळाचा धोका यामुळे पर्यटकांनी किना-यांवर पाठ फिरवली असल्याचे दिसत आहे. खाडीतील बोटींग सफरीसाठी ‘कायक‘ सज्ज झाले होते. पण या पावसाने कायक सफरही बंद ठेवण्याची वेळ आली आहे. एकंदरच या पावसाने सर्वांचेच नुकसान केले आहे. या हंगाम सुकाच गेल्याने संबंधित व्यावसायीकांना आर्थिक फटकाही बसणार आहे.


