कुडाळ शहरातील “त्या” गणेशघाट सुशोभीकरणाचे संपूर्ण श्रेय विनायक राऊत, वैभव नाईक यांचेच-माजी उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट

कुडाळ,दि.२९ ऑक्टोंबर

माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ येथे आयोजित शिमगोत्सवाला तत्कालीन पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आले असताना मी कुडाळ शहराचा उपनगराध्यक्ष म्हणून कुडाळ शहरामध्ये गेली कित्येक वर्ष प्रलंबित असलेला गणेश घाट सुशोभीकरणाचे काम तत्काळ मंजूर व्हावे अशी मागणी कुडाळ शहरवासियांच्या वतीने मी आदित्य ठाकरे यांच्याकडे केली होती. त्याची तत्काळ दखल घेत आदित्य ठाकरे यांनी कुडाळ भंगसाळ नदी येथे गणेश घाट सुशोभीकरण कामासाठी ९० लाख रुपये मंजूर केले. त्याबाबत शासन निर्णय क्रमांक ननपं २०२२ /प्र.क्र . ६६(क ९५ – १)/नवी -१६) दि. ३० मार्च २०२२ रोजी निर्गमित करण्यात आला आहे, अशी माहिती कुडाळचे माजी उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट यांनी दिली.
सदर कामाचा शासन निर्णय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री असताना महाविकास आघाडीच्या काळात माजी खासदार विनायक राऊत, माजी आमदार वैभव नाईक यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे झाला आहे. त्या संदर्भात गणेशघाटाची रूपरेषा व त्या संदर्भातील बातम्या वृत्तपत्रात प्रसारित देखील झाल्या होत्या. त्यामुळे कुडाळ शहरातील भंगसाळ नदी येथील गणेश घाट सुशोभीकरणाचे संपूर्ण श्रेय हे माजी खासदार विनायक राऊत, माजी आमदार वैभव नाईक यांचेच आहे असे कुडाळचे माजी उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट यांनी सांगितले आहे.